भारताचे सरन्यायाधीश म्हणून राजेंद्रमल लोढा यांचा शपथविधी आज झाला. ते देशाचे ४१ वे सरन्यायाधीश असून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यांना शपथ दिली. न्या. लोढा ( ६४) हे आता निवृत्त सरन्यायाधीश पी.सतशिवम यांची जागा घेतील. ते आज निवृत्त झाले. राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे एका छोटय़ा कार्यक्रमात त्यांना शपथ देण्यात आली त्यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग व काही केंद्रीय मंत्री, आजी-माजी न्यायाधीश उपस्थित होते. विरोधी पक्षाचा एकही नेता उपस्थित नव्हता. न्या. लोढा यांनी ईश्वरसाक्ष शपथ घेतली, ते पाच महिने सरन्यायाधीश राहणार असून २७ सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. कोळसा घोटाळा प्रकरणी सीबीआयने केलेल्या चौकशीबाबतची सुनावणी त्यांच्यासमोर झाली होती. सीबीआयने कोलगेट प्रकरणी त्यांची माहिती राजकीय नेत्यांशी वाटून घेऊ नये असे लोढा यांच्या नेतृत्वाखालील पीठाने सांगितले त्यामुळे कायदा मंत्री अश्वनीकुमार यांना गेल्या मे महिन्यात पद गमवावे लागले होते. लोढा हे घटनापीठाचे सदस्य असून अल्पसंख्य शाळातील शिक्षणाच्या मुद्दय़ात लक्ष घालत आहेत. शांत क्षेत्रातील सैनिकांना मतदारसंघात जाऊन मतदान करण्याची परवानगी देताना त्यांनी म्हटले होती की, नोकरीतील अपरिहार्यता मूलभूत हक्कात आड येता कामा नये. देशातील वैद्यकीय चाचण्या थांबवण्याचा लोकहिताचा आदेश त्यांनी दिला होता, यातील व्यक्तींना भरपाई देण्याचा निकालही त्यांनी दिला होता. लोढा यांचा जन्म जयपूर येथे झाला. विधी शिक्षणानंतर ते १९७३ मध्ये राजस्थान बार कौन्सिलचे सदस्य झाले. १९९४ मध्ये राजस्थान उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश झाले.  त्यांची त्याच वर्षी मुंबई उच्च न्यायालयात बदली झाली नंतर २००७ मध्ये ते पुन्हा राजस्थान उच्च न्यायालयात आले. १३ मे २००८ मध्ये पाटणा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले व १७ डिसेंबर २००८ रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती झाले.