भाजपा खासदार कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर सीआयएसफमध्ये काम करणाऱ्या एका महिला कॉन्स्टेबलने कानशिलात लगावली. कुलविंदर कौर असं या महिला कॉन्स्टेबलचं नाव आहे. कंगना यांना दिल्लीला पोहचायचं होतं. त्याआधी त्या चंदीगढ विमानतळावर पोहचल्या होत्या. त्यावेळी कर्टन रुममध्ये ही घटना घडली. ७ जून च्या दिवशी ही घटना घडली. या प्रकरणावर अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. आता दिग्दर्शक करण जोहर यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

कुलविंदर कौर यांना अटक

चंदीगढ विमानतळवर झालेल्या या घटनेनंतर कंगना रणौत दिल्लीत पोहचल्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महासंचलाक नीना सिंह यांना ही सगळी घटना सांगितली. कंगना यांनी हा आरोप केलाय की चंदीगढ एअरपोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला थोबाडीत ठेवून दिली. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना तातडीने ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची करण्यात आली. चंदीगढ एअरपोर्टवर असलेलं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलं. कंगना यांना थोबाडीत ठेवून दिल्याप्रकरणी कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर त्यांना ८ जून रोजी अटक करण्यात आली.

हे पण वाचा- ‘मिले ना मिले हम’ म्हणत लोकसभेत पुन्हा भेटले; खासदार कंगना-चिरागची जोडी आता लोकसभेत

कोण आहेत कुलविंदर कौर?

कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही. कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत.

करण जोहरने काय म्हटलं आहे?

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्या श्रीमुखात भडकावल्याप्रकरणी करण जोहरला विचारणा करण्यात आली तेव्हा करण म्हणाला, “मी कुठल्याही प्रकारच्या हिंसेचं कधीही समर्थन करत नाही. मग ती हिंसा शारिरीक असो किंवा शाब्दिक. मला ते चुकीचंच वाटतं.” असं म्हणत करणने या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणौत आणि करण जोहरचं वैर सर्वश्रुत

कंगना रणौत आणि करण जोहरचं वैर सर्वश्रुत आहे. कंगनाने करण जोहरवर नेपोटिझमचा आरोप केला होता. त्यावेळी या दोघांचा चांगलाच वाद झाला होता. तसंच कंगनाने रॉकी और रानी या चित्रपटावरही टीका केली होती. “भारतीय प्रेक्षक अण्वस्त्र निर्मिती आणि अणुविज्ञानावर आधारित ३ तासांचा चित्रपट पाहत आहेत आणि इथे नेपोटिझम गँगची तीच सासू आणि सून रडगाण्याची स्टोरी तू दाखवत आहेस, करण जोहर तुला लाज वाटली पाहिजे की तू एकसारखेच चित्रपट इतक्यांदा कसे तयार करतोस?” असा प्रश्न कंगनाने विचारला होता.