हिमाचलच्या मंडी या मतदारसंघातून भाजपाच्या खासदार म्हणून निवडून आलेल्या अभिनेत्री कंगना रणौत यांना चंदीगढ विमानतळावर एका अपमानजनक प्रसंगाला सामोरं जावं लागलं. गुरुवारी त्या विमानतळावर आल्या. तेव्हा कर्टन रुममध्ये कुलविंदर कौर या या सीआयएसफच्या महिला कॉन्स्टेबलने त्यांच्या कानशिलात लगावली. आज होणाऱ्या खासदारांच्या बैठकीसाठी कंगना यांना दिल्लीला पोहचायचं होतं. त्याआधी त्या चंदीगढ विमानतळावर आल्या. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेची चांगलीच चर्चा होते आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुलविंदर कौर यांना अटक

या संपूर्ण प्रकारानंतर घटनेनंतर कंगना रणौत दिल्लीत पोहचल्या. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सीआयएसएफच्या महासंचलाक नीना सिंह यांना ही सगळी घटना सांगितली. कंगना यांनी हा आरोप केलाय की चंदीगढ एअरपोर्टच्या कर्टन एरियात कॉन्स्टेबल कुलविंदर कौर यांनी आपल्याशी गैरवर्तन केलं आणि आपल्याला थोबाडीत ठेवून दिली. या घटनेनंतर कुलविंदर कौर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. चंदीगढ एअरपोर्टवर असलेलं सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलं. कंगना यांना थोबाडीत ठेवून दिल्याप्रकरणी कुलविंदर कौर यांना निलंबित करण्यात आलं. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.

हे पण वाचा- Video: कंगना रणौत यांच्या कानशिलात लगावणाऱ्या कुलविंदर कौरला १ लाख रुपयांचे बक्षीस देणार, व्यावसायिकाने केली घोषणा

कोण आहेत कुलविंदर कौर?

कंगना रणौत यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या कुलविंदर कौर या सीआयएसफमध्ये कॉन्स्टेबल आहेत. त्या ३५ वर्षीय आहेत. त्यांचं कुटुंब सुल्तानपूर येथील लोधी या ठिकाणी राहतं. मागच्या १५ वर्षांपासून कुलविंदर कौर या सीआयएसएफमध्ये काम करतात. आजवर त्यांच्या कारकिर्दीला कुठलाही कलंक लागलेला नाही.

कुलविंदर कौर या कर्तव्य बजावत असताना कधीही त्यात कसूर करत नाहीत. हे त्यांचं १५ वर्षांचं रेकॉर्ड सांगतं आहे. कुलविंदर कौर या कपूरथला या ठिकाणी त्यांच्या पतीसह राहतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांचा भाऊ शेर सिंह हे शेतकरी नेते आहेत. तर किसान मजदूर संघर्ष समितीत ते सचिव आहेत. या सगळ्या प्रकारानंतर अभिनेते नाना पाटेकर यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणौत यांच्याविषयी काय म्हणाले नाना पाटेकर?

“कंगना रणौत यांच्याबाबत जो प्रकार घडला तो दुर्दैवी आहे. असं कुणाच्याही बाबतीत होणं चांगलं नाही. मुळीच चांगलं नाही. जे घडलं ते घडायला नको होतं.”

नव्या सरकारला शुभेच्छा!

“देशात नवं सरकार स्थापन होतं आहे चांगली गोष्ट आहे. यावेळी विरोधकही तगडे आहेत. त्यामुळे दोन्ही मिळून देश योग्य प्रकारे चालवतील असं मला वाटतं. महाराष्ट्रात निवडणूक होणार आहे. पण ठीक आहे, आम्ही फक्त शेतकऱ्यांसाठी मदत मागतो आहोत. कर्जमाफीपेक्षा आम्हाला योग्य मोबदला मिळाला तर कर्जमाफीच्या गोष्टींवर शेतकऱ्यांना अवलंबून रहावं लागणार नाही असं मला वाटतं. १०० रुपये जर शेतकऱ्यांचे खर्च होत असतील तर त्यांना १५० रुपये द्या इतकीच आमची मागणी आहे” असंही नाना पाटेकर म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kangana ranaut slapped by cisf woman constable nana patekar says it is wrong and it should not have happened scj
First published on: 07-06-2024 at 19:08 IST