केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आरिफ खान म्हणाले, “विजयन यांनी मला शारीरिक इजा करण्यासाठी कट रचला आहे.” राज्यपालांची कार विमानतळाकडे जात असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची (माकपा) विद्यार्थी शाखा असलेल्या स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनाने राज्यपालांच्या गाडीला धडक दिली होती. या घटनेनंतर राज्यपालांनी थेट केरळच्या मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. राज्यपाल दिल्लीला जाण्यासाठी तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने जात होते, तेव्हाच ही घटना घडली.
या अपघातानंतर राज्यपालांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले, मला इजा पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्री विजयन यांनी कट रचला आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या माणसांना पाठवलं होतं. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेची, संवैधानिक मूल्यांची पायमल्ली होत आहे. एखाद्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरू असेल आणि तिथे आंदोलकांच्या गाड्या आल्या तर पोलीस त्या गाड्यांना कार्यक्रमस्थळी जाऊ देतील का? मुख्यमंत्र्याच्या गाडीजवळ कोणालाही जाऊ दिलं जाईल का? इथे मात्र पोलिसांनी तसं करू दिलं. तसेच आंदोलकांच्या गाड्या उभ्या करून पोलिसांनीच त्यांना आत ढकललं आणि तिथून पळ काढू दिला.
राज्यपाल आरिफ खान म्हणाले, माझं आणि मुख्यमंत्री विजयन यांचं एखाद्या मुद्द्यावर एकमत नसेल तर याचा अर्थ असा नव्हे की, या दिग्गज मार्क्सवादी नेत्याने मला दुखापत करण्याचा कट रचावा. आंदोलकांनी केवळ मला विरोध केला नाही किंवा काळे झेंडे दाखवून ते शांत बसले नाहीत. तर त्यांनी दोन्ही बाजूंनी माझ्यावर हल्ला केला. त्यानंतर मी माझ्या कारमधून उतरलो. पण ते (आंदोलक) तिथून पळून का गेले? ते कळलं नाही. तसेच ते सगळे एकाच गाडीत बसून आले होते हे पोलिसांना माहीत होतं.
हे ही वाचा >> “तुम्हाला काश्मीर नको? तेव्हा सरदार पटेल नेहरूंवर नाराज होते”, अमित शाहांनी सांगितला सॅम माणेकशांबरोबरच्या बैठकीचा किस्सा
आरिफ खान म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी मला इजा पोहोचवण्याचा कट रचला होता. त्यांच्या गुंडांनी तिरुवनंतपुरममधील रस्त्यांचा ताबा घेतला आहे. राजभवनातील सूत्रांनी सांगितलं की, खान यांच्या प्रवासादरम्यान, तीन ठिकाणी त्यांना आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. यापैकी दोन ठिकाणी त्यांच्या कारला धडक मारण्यात आली. तर पोलिसांनी म्हटलं आहे की, एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी एकाच ठिकाणी राज्यपालांच्या कारला काळे झेंडे दाखवले आणि त्यांची कार आडवली. विद्यार्थी संघटनेतील सात कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.