Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाकडून मिळालेला अंतरिम जामीन १७ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान कुणाल कामराने एक पोस्ट केली आहे आणि बुक माय शोला खुलं पत्र लिहिलं आहे.

कुणाल कामराची बुक माय शोला उद्देशून पोस्ट काय?

“मी समजू शकतो की BookMyShow ला राज्य सरकारशी सलोख्याचे आणि सौहार्दाचे संबंध ठेवायचे आहेत. त्याचप्रमाणे मी हे देखील जाणून आहे की मुंबई हे मनोरंजनसाठीचं मोठं केंद्र आहे. राज्य सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय गन्स अँड रोझेस किंवा कोल्ड प्ले यांसारखे आयकॉनिक शोज तिथे होणार नाहीत. तुम्ही मला डिलिस्ट केलं आहे हा मुद्दा नाही. कलाकारांच्या कार्यक्रमांची यादी करणं, ती पोस्ट करणं हा तुमचा अधिकार आहे. मात्र २०१७ ते २०२५ या कालावधीत मी सादर केलेल्या कार्यक्रमांची यादी वेबसाईटवर टाकायची नाही हे नाकारुन मला प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यातच रोखण्यात आलं आहे. लिस्टिंग शोजसाठी तुम्ही १० टक्के रक्कम घेता. ते तुमचं बिझनेस मॉडेल आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे एखादा कॉमेडियन मोठा असो वा लहान त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी दिवसाला त्याला साधारण ६ ते १० हजार रुपये खर्च करावा लागतो. हा खर्च एखाद्या अतिरिक्त बोजाप्रमाणे आहे, मात्र कलाकारांना तो खर्च सहन करावा लागतो.”

कुणाल कामराची बुक माय शोला विनंती

“माझी तुम्हाला एकच विनंती आहे आणि ती काही कठीण नाही. मला माझ्या प्रेक्षकांची संपर्क सूची पुरवा, माझ्या सोलो शोजमध्ये हे प्रेक्षक होते त्यांची माहिती मला हवी आहे. एखाद्या ठिकाणी मी ३० कलाकारांसह पुण्यात वगैरे कॉमेडी शो केला तर तो त्या शोचा सामूहिक डेटा समजला जाईल. मात्र मी सोलो शोबाबत तुम्हाला विनंती करतो आहे. कारण त्या शोजना आलेले प्रेक्षक हे माझे प्रेक्षक आहेत. मला डिलिस्ट करण्याचा अधिकार तुमचा आहे तसा माझ्या प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याच अधिकार मला आहे. शिवाय एक विनंती आणखी आहे की मला डिलिस्ट करु नका किंवा मला माझ्या प्रेक्षकांची संपर्क सूची द्या ही तुम्हाला नम्र विनंती आहे.” असं म्हणत कुणाल कामराने ही पोस्ट लिहिली आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.