लखनौ न्यायालयामधून फेब्रुवारी २००७ मध्ये पलायन केलेल्या ‘लष्कर-ए-तैयबा’च्या दोन अतिरेक्यांनीच २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील कसाब व इतर अतिरेक्यांना प्रशिक्षण दिल्याचे उघड झाले आहे. चौकशी दरम्यान अजमल कसाब याने ही माहिती चौकशी अधिकाऱ्यांना दिल्याचे समोर आले आहे.
‘लष्कर’च्या मकसूद अहमद आणि मोहम्मद सईद या अतिरेक्यांनी कसाब व त्याच्या इतर साथीदारांना पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण दिले. मुंबई हल्ल्याची योजना कशी आखायची, लोकांना कशा प्रकारे मारायचे आणि पकडले गेल्यास पलायन कसे कराय़चे याचे मकसूद व सईद या दोघांनी मार्गदर्शन केल्याचे कसाबने चौकशी अधिकाऱ्यांकडे कबूल केले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मकसूद व सईद यांना उत्तर प्रदेश पोलीसांनी २००२ मध्ये आयोध्येजवळील फैजाबादमध्ये ‘पोटा’ अंतर्गत अटक केली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये ‘लष्कर-ए-तैयबा’च्या कारवाया करण्याचा व तरूणांना ‘लष्कर’च्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याची कबूली मकसूद व सईद यांनी पोलीसांजवळ दिली होती.

Story img Loader