Jammu Kashmir Terror Attack : पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण यंत्रणा आता अ‍ॅक्शन मोडवर आहे. एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) जम्मू-काश्मीर पोलिसांबरोबर मिळून तपास सुरू केला आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांमध्ये आसिफ शेख याचं देखील नाव समोर आलं होतं. त्यानंतर पोलीस व एनआयएचं एक पथक आसिफच्या त्राल (काश्मीर) घरी धडकलं. पोलीस आसिफच्या घरी तपास करत असतानाच त्यांना घरात काही संशयित वस्तू व स्फोटकं आढळली. त्याचदरम्यान या घरात मोठा स्फोट होऊन घर बेचिराख झालं.

पोलीस त्राल येथील आसिफ शेख याच्या घरात तपास करत असतानाच त्यांना तिथे काही संशयित वस्तू आढळल्या होत्या. पोलिसांनी सांगितलं की घरात आम्हाला स्फोटकं दिसली होती जी आम्ही जप्त करण्याआधीच स्फोट झाला. घरात स्फोटकं पाहिल्यानंतर पुढचा धोका ओळखून पोलीस व संरक्षण दलाचे जवान मागे हटले. तेवढ्यात घरात मोठा स्फोट झाला आणि या स्फोटात आसिफचं घर बेचिराख झालं. अतिरेक्यांनी पोलीस व गुप्तचर यंत्रणा या घरी धडकतील आणि तपास करतील याचा अंदाज घेऊन आधीच इथे स्फोटकं (उदा. टाईम बॉम्ब) ठेवली असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

एलओसीजवळ पाकिस्तानकडून गोळीबार

दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने चोहोबाजूंनी पाकिस्तानची नाकेबंदी सुरू केलेली असताना पाकिस्तानच्या कुरापती थांबलेल्या नाहीत. गुरुवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने एलओसीजवळ (प्रत्यक्ष नियंत्रणरेषा) गोळीबार केला. भारतीय सैन्याने देखील या गोळीबाराला जशास तसं प्रत्युत्तर दिलं. मात्र,या हल्ल्यात दोन्ही बाजूला कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सीमेवर तणावाची स्थिती आहे. केंद्र सरकारने भारतीय सैन्याला हाय अलर्ट जारी केला आहे.

सीमेवर तणावाची स्थिती असताना भारतीय सैन्याचे प्रमुक उपेंद्र द्विवेदी हे श्रीनगर व उधमपूरचा दौरा करणार आहेत. तिथे ते संरक्षण संस्थांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटतील. त्यांच्याकडून सर्व सीमांवरील स्थितीचा आढावा घेतील. पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी देखील घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्योरिटीच्या बैठकीला हजेरी लावली.