केंद्रीय कायदामंत्री अश्वनीकुमार, अ‍ॅटर्नी जनरल गुलाम वहानवटी व पंतप्रधान कार्यालय व कोळसा मंत्रालयातील अधिकारी यांच्या सूचनांनुसारच कोळसा खाणवाटप भ्रष्टाचाराच्या तपासासंदर्भातील स्थितिदर्शक अहवालात बदल केल्याचे प्रतिज्ञापत्र केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) संचालक रणजीत सिन्हा यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दाखल केले. अहवालात बदल केले असले तरी त्याचा परिणाम संपूर्ण तपास अहवालावर झालेला नाही तसेच त्यामुळे तपासाची दिशाही बदलली नसल्याचे सिन्हा यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.
स्थितिदर्शक अहवालातील बदलासंदर्भात वरील सर्वाशी झालेल्या बैठकीचा तपशीलच सिन्हा यांनी या प्रतिज्ञापत्रात सादर केला आहे. या बैठकीला अश्वनीकुमार यांच्यासह गुलाम वहानवटी, तत्काली अतिरिक्त सॉलिसिटर जनरल हरेन रावल व पंतप्रधान कार्यालय आणि कोळसा मंत्रालयातील अधिकारी उपस्थित होते. अश्वनीकुमार आणि वहानवटी यांच्या सूचनेनुसार अहवालात बदल करण्यात आले असले तरी त्यामुळे अहवाल पूर्णपणे बदलला किंवा तपासाची दिशाच बदलली असे नाही, असेही सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे.