न्यायालय परिसरात विद्यार्थी व पत्रकारांना धक्काबुक्की ; अमित शहांच्या आरोपांना काँग्रेसचे प्रत्युत्तर
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हय्या कुमार याच्यावरील देशद्रोहाच्या प्रकरणाची सुनावणी होणार असलेल्या दिल्लीतील न्यायालयाबाहेर वकिलांनी विद्यार्थी व प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींपैकी काही जणांना धक्काबुक्की केली. दरम्यान, कुमारला आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारच्या अटकेविरोधात जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी सोमवारपासून संप पुकारला आहे.
येथील पटियाला हाऊस न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होण्यापूर्वी, वकिलांचा पोशाख घातलेले काही लोक आत शिरले आणि त्यांनी जेएनयूचे विद्यार्थी व शिक्षक यांना, तसेच प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना कथितरीत्या तेथून बाहेर काढण्यास सुरुवात केली. ‘‘तुम्ही (जेएनयू) राष्ट्रविरोधी आणि दहशतवादी तयार करता. तुम्ही देशाबाहेर निघून जायला हवे,’’ असे सांगत आणि ‘भारतमाता की जय, जेएनयू बंद करा’ अशा घोषणा देत ते विद्यार्थी व शिक्षकांना ढकलत होते. आम्ही न्यायालयात असताना, वकिलांचा पोशाख घातलेल्या काही लोकांनी आम्हाला शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांच्यापैकी काही जणांनी एकाएकी आम्हाला धक्काबुक्की सुरू केली. त्यांनी आम्हाला ढकलले व मारहाण केली, असे एआयएसएफचे अध्यक्ष वलिउल्ला कादरी यांनी पत्रकारांना सांगितले. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दाखल केलेल्या एका बदनामीच्या खटल्यासंदर्भात न्यायालयात आलेल्या भाजपच्या एका आमदारानेही भाकपच्या एका कार्यकर्त्यांला कथितरीत्या धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, कन्हय्या कुमार याची सुटका केली जाईपर्यंत जेएनयूतील विद्यार्थी सोमवारपासून संपावर गेले. विद्यापीठातील शिक्षकांनी रविवारी विद्यार्थ्यांना पाठिंबा जाहीर केला असला, तरी ते संपात सहभागी झालेले नाहीत. तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या कन्हय्याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. विद्यापीठाच्या शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊ नये म्हणून संप किंवा निदर्शने यांसारखे मार्ग चोखाळू नयेत, असे आवाहन कुलगुरू जदेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेएनयूमधील घटना हा कारस्थानाचा भाग – संघ
मीरत: जेएनयूमधील घटना हा ‘कारस्थानाचा’ भाग असून, पाकिस्तान व अफझल गुरूच्या समर्थनार्थ घोषणा देणारे लोक ‘देशद्रोही’ असल्यामुळे त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप लावण्यात यावा, अशी मागणी रा. स्व. संघाचे नेते दत्तात्रय होसबळे यांनी केली आहे. अशा प्रकारची घोषणाबाजी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कठोर वागणूक द्यायला हवी, असे ते म्हणाले. शिक्षणाचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका संस्थेतील विद्यार्थ्यांची एक पिढी अशा रीतीने देशविरोधी घोषणाबाजी करत असल्याबद्दल संघाचे सहकार्यवाह असलेले होसबळे यांनी येथे आयोजित करण्यात आलेल्या महानगर स्वयंसेवक संगममध्ये आश्चर्य व्यक्त केले. १९७५ साली संपूर्ण देशाचे तुरुंगात रूपांतर करण्यासाठी जबाबदार असलेला पक्ष आता विचारस्वातंत्र्याच्या गप्पा मारतो आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसवर केली.

काँग्रेसचा आरोप
हफीज सईद याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संघर्षांला पाठिंबा दिला असल्याचे वक्तव्य गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. त्यावर काँग्रेसने टीका केली आहे. गृहमंत्री या प्रश्नाला राजकीय रंग देत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारतावर हल्ले केल्याबद्दल सईदला अटक करण्यास सांगावे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

‘अफजल जी’ म्हटल्याने वाद
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत अफजल गुरूच्या नावाचा आदरपूर्वक उल्लेख केल्याने नवा वादंग निर्माण झाला. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर बोलण्यासाठी सुरजेवाला यांच्याकडून ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या वेळी बोलताना सुरजेवाला यांनी अफजल गुरूच्या नावामागे ‘जी’ अशी उपाधी लावली. सुरजेवाला म्हणाले ,राज्यघटनेवर आमचा विश्वास नसता तर सर्व कायदेशीर पर्याय अजमावल्यानंतर अफजल गुरूला फाशी दिली नसती. दरम्यान, या प्रकरणावरून वाद निर्माण झाल्यानंतर आपण चुकीमुळे तसे बोलून गेल्याचे स्पष्टीकरण सुरजेवाला यांनी दिलगिरी व्यक्त केली.

‘राष्ट्रविरोधी’ म्हटल्याची फिकीर नाही- येचुरी
नवी दिल्ली: माकपचे नेते सीताराम येचुरी यांना जेएनयू प्रकरणाच्या संदर्भात कथितरीत्या धमक्या मिळाल्याची तक्रार पक्षाने केली आहे. मात्र कुठल्याही धमक्यांशी ‘लढा देण्याची’ तयारी दाखवतानाच, या वादाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे आपल्याविरुद्ध ‘राष्ट्रविरोधी’ असा शिक्का मारण्यात आल्याची आपल्याला काळजी नाही, असे डाव्या पक्षांनी म्हटले आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्या अटकेविरुद्ध निदर्शने करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिल्याबद्दल माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांना रविवारी रात्री १०.३० ते १ या वेळेत धमकी देणारे तीन दूरध्वनी आले. तुम्ही जे काय करत आहात ते योग्य नसून, आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे सुरूच ठेवल्यास तुम्हाला पाहून घेऊ, अशी धमकी फोन करणाऱ्याने दिल्याचे पक्षाने सांगितले.अशाप्रकारच्या धमक्यांना तोंड देण्यास आम्ही तयार असल्याचे सांगितले.

‘सरकारकडून विचार स्वातंत्र्याची गळचेपी’
मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांनी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्याचा ठपका ठेवून कन्हया कुमार या विद्यार्थ्यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे भाजप सरकार विचार स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
नेहरू विद्यापीठात कुणी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या असतील तर, त्याचा आम्ही धिक्कार करतो, परंतु घोषणा देणारे कोण आहेत, ते जाहीर करावे, असे आवाहन आंबेडकर यांनी केले. ज्यांनी घोषणा दिल्या, त्याचे चित्रीकरण पोलिसांकडे उपलब्ध आहे. पोलिसांनीच ते लोकांसमोर आणावे असे सांगून, कोणताही पुरावा नसताना विद्यार्थ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करणे म्हणजे आंबेडकरी व डाव्या विचारांच्या संघटनांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे, अशी टीका केली.

आरोप-प्रत्यारोप
* जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घडामोडींवरून भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि राहुल गांधी यांनी परस्परांवर चिखलफेक केली. राहुल देशविरोधी शक्तींना पाठिंबा देत असून भारताची आणखी फाळणी होण्याची त्यांची इच्छा आहे, असे शहा म्हणाले. विद्यापीठाबाबत घेतलेल्या भूमिकेबद्दल राहुल यांनी माफी मागावी, असे शहा म्हणाले.
* भाजप फूट आणि तिरस्काराचा कार्यक्रम राबवीत असल्याचे राहुल गांधी यांनी आसाम दौऱ्यात म्हटले आहे.
ल्लमाकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही भाजपला लक्ष्य केले. गोडसेंची पूजा करणारे राष्ट्रवादाचे प्रमाणपत्र देत आहे यासारखा दुसरा हास्यास्पद प्रकार नाही, असे येचुरी यांनी म्हटले आहे.

राहुल गांधी देशविरोधी शक्तींना पाठिंबा देत असून भारताची आणखी फाळणी होण्याची त्यांची इच्छा आहे. राहुल गांधी यांनी जी भूमिका घेतली त्याबाबत त्यांनी माफी मागावी. डाव्यांच्या पुरोगामी विचारसरणीच्या नावाखाली देशविरोधी शक्तींना पाठिंबा देणे समर्थनीय नाही.
अमित शहा, भाजप अध्यक्ष

भाजप फूट आणि तिरस्काराचा कार्यक्रम राबवीत आहे. जनतेत फूट पाडणे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम असल्याचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घडामोडींवरून स्पष्ट होत आहे. त्यांना जनतेवर आपली मते लादण्याची इच्छा आहे.
राहुल गांधी,
काँग्रेस उपाध्यक्ष

कन्हया कुमार विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणारे भाजप सरकार विचार स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहे. नेहरू विद्यापीठात कुणी पाकिस्तानच्या बाजूने घोषणा दिल्या असतील तर, त्याचा आम्ही धिक्कार करतो, परंतु घोषणा देणारे कोण आहेत, ते जाहीर करावे.
– अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर ,
भारिप-बहुजन महासंघाचे नेते

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lawyers jnu students clash in patiala house court premises