मागील काही दिवसांपासून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि राज्यपाल सी.वी.आनंद बोस विविध कारणांवरून वाद सुरू आहेत. अशात आता राज्यपालांनी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांना दंड ठोठावल्याने ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. तुम्हाला जेवणाच्या डब्यासाठी पैसे पाहिजे असतील, तर मी देते, असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळातही विविध चर्चा रंगू लागल्या आहेत.

हेही वाचा – “ममता बॅनर्जींबाबत आमच्या मनात आदर, पण त्यांनी…”; ‘त्या’ विधानानंतर बांगलादेशने व्यक्त केली नाराजी!

राज्यपालांकडून आमदारांना ५०० रुपयांचा दंड

खरं तर पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निडवणुकीबरोबरच विधानसभेची पोटनिवडणूकही पार पडली होती. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसच्या चार उमेदवारांचा विजय झाला होता. त्यानंतर ५ जुलै रोजी विधानसभेत त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. मात्र, काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसच्या दोन आमदारांना राज्यपालांनी पत्र लिहत त्यांची शपथ घटनात्मदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगितले. तसेच त्यांना सभागृहाच्य कामकाजात सहभागी होण्यास मनाई केली. मात्र, तरीही दोन्ही आमदारांनी सभागृहाच्या कामकाजत भाग घेतला. त्यामुळे राज्यपालांनी त्यांना प्रतीदिवस ५०० रुपयांचा दंड ठोठावला.

दंड ठोठवायला घोटाळेबाज दिसत नाही का?

यावरून ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल सी.वी.आनंद बोस यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यपाल सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यपालांनी हे लक्षात ठेवावं की त्यांची नियुक्ती केंद्र सरकारद्वारे झाली आहे, पण आमदारांना जनतेने निवडून दिलं आहे. राज्यपालांना नीट परीक्षेतील घोटाळेबाजांना दंड ठोठावता येत नाही. ते घोटाळेबाज त्यांना दिसत नाही. त्यांना दंड ठोठावण्यासाठी फक्त आमदार दिसतात, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी विधानसभेत बोलताना केली.

हेही वाचा – “बांगलादेशातील पीडित नागरिकांसाठी आमचे दरवाजे उघडे”; हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर ममता बनर्जींचे मोठं विधान!

ममता बॅनर्जींची राज्यपालांवर बोचरी टीका

पुढे बोलताना आमदारांना दंड ठोठवायला राज्यपालांकडे पेसै नाहीत का? त्यांना जेवण्याच्या डब्यासाठी पैसे हवे असतील तर त्यांनी मला मागावे, मी त्यांना पैसे देईन, असा टोलाही ममता बॅनर्जी यांनी राज्यपालांना लगावला.