Crime News : Instagram रिल्स वरुन पत्नीशी वाद झाल्याने पतीने तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता आणि इन्स्टाग्रामवर तिला रिल्स टाकण्यास मनाई करत होता. ती जेव्हा रिल्स तयार करायची तेव्हा त्या दोघांमध्ये वाद व्हायचा. अशात पतीने पत्नीची हत्या केली आहे. पोलिसांना या महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. यानंतर पोलिसांनी महिलेच्या पतीला अटक केली आहे.

सध्याच्या घडीला अनेकांना सोशल मीडियाशिवाय चैन पडत नाही त्याची खूप सवय लागली आहे हे अनेकदा दिसून येतं. त्यातून अनेकदा पती-पत्नीमध्ये वाद होतांनाही दिसतात. मात्र या घटनेत पतीने पत्नीची हत्या केली आहे. धारदार कात्र्या आणि हातोडीचे वार करुन पतीने पत्नीला ठार केलं आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या प्रकरणातील महिलेच्या पतीचा शोध घेतला आणि त्याला अटक केली आहे.

नेमकी ही घटना कुठे घडली?

रायपूर या ठिकाणी असलेल्या बलोडाबाझार जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचं नाव ज्योती रात्रे असं होतं. ती तेलासी गावात वास्तव्य करायची. तिच्या नवऱ्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेत आणि ती इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करते म्हणून तिची हत्या केली. तिच्या पतीचं नाव धीरज रात्रे असं आहे. पत्नी ज्योती इन्स्टाग्रामवर रिल्स पोस्ट करते हे त्याला आवडत नव्हतं. तो अनेकदा तिच्यावर संशय घ्यायचा. अखेर धीरजने तिची हत्या केली.

हत्येच्या दिवशी नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज रात्रे त्याची पत्नी ज्योतीला म्हणाला की आपण तुझ्या आईच्या घरी जाऊ. त्यानंतर हे दोघं मोटरसायकलवर ज्योतीच्या आईच्या घरी जायला निघाले. तेलासीहून बलोडाबाजार या ठिकाणी जात असताना जुनवानी गावाजवळ असलेल्या दगडाच्या खाणीजवळ या दोघांमध्ये इन्स्टाग्राम रिल्सवरुन वाद सुरु झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की धीरजने ज्योतीवर दोन धारदार कात्र्यांनी आणि हातोडीने वार केले. या हल्ल्यात ज्योती जागेवरच ठार झाली. ज्योतीची हत्या केल्यानंतर धीरजने त्या ठिकाणाहून पळ काढला. मात्र पोलिसांना या घटनेची माहिती जेव्हा मिळाली तेव्हा त्यांना ज्योतीचा मृतदेह सापडला. त्यानंतर धीरजला पोलिसांनी अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.