माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आरोप
देशातील तरुण, शेतकरी, व्यापारी आणि प्रत्येक घटनात्मक संस्थांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ क्लेशदायक आणि विनाशकारी राहिलेला असल्यामुळे त्यांना आता बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे मत माजी पंतप्रधान ममनमोहन सिंग यांनी व्यक्त केले.
मोदी यांच्या बाजूने लाट असल्याचे त्यांनी फेटाळून लावले. सर्वसमावेशक विकासावर विश्वास न ठेवणारे आणि केवळ स्वत:च्या राजकीय अस्तित्वाबाबत चिंतित असलेल्या सरकारला सत्तेवरून हटवण्याबाबत लोकांनी ठरवून टाकले आले आहे, असे सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
गेल्या पाच वर्षांत अकल्पनीय प्रमाणात भ्रष्टाचाराचा ‘दरुगध’ अनुभवाला आला असल्याचा आरोप मनमोहन सिंग यांनी केला. निश्चलनीकरण हा स्वतंत्र भारतातील बहुतेक ‘सगळ्यात मोठा घोटाळा’ होता, असेही ते म्हणाले.
मोदी यांच्या पाकिस्तानबाबतच्या धोरणाचे वर्णन माजी पंतप्रधानांनी गचाळ असे केले. आमंत्रण नसताना पाकिस्तानला जाण्यापासून ते एका दहशतवादी हल्ल्याच्या संबंधात आयएसआयला पठाणकोट हवाई तळाच्या पाहणीसाठी प्रवेश देण्यापर्यंत या धोरणात अनेक विसंगती पाहायला मिळाल्याची टीका त्यांनी केली.
देश आर्थिक मंदीच्या दिशेने..
देश आर्थिक मंदीच्या दिशेने वाटचाल करत असून, मोदी सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला ‘गंभीर परिस्थितीत’ आणून सोडले असल्याचा आरोप देशाच्या आर्थिक सुधारणांचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या मनमोहनसिंग यांनी केला.
पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबतच्या मंत्रिमंडळ समितीची बैठक घेण्याऐवजी मोदी जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात ‘चित्रपटाचे चित्रीकरण’ करत होते ही बाब ‘क्लेशदायक’ असल्याचेही सिंग यांनी सांगितले. पुलवामा प्रकरणात गुप्तचर यंत्रणेचे घोर अपयश हे दहशतवादाचा सामना करण्यास सरकारची किती तयारी आहे हे दिसून येते असेही ते म्हणाले.