जवळपास चार वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम ३७० केंद्र सरकारने हटवलं. यावरून काश्मीरमधील अनेक पक्ष तसेच पीडीपी पक्ष केंद्र सरकारचा सातत्याने विरोध करत आहेत. पीडीपी नेत्या आणि जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. मुफ्ती म्हणाल्या काश्मीर खोऱ्यात कलम ३७० लागू होत नाही तोवर मी निवडणूक लढणार नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा उल्लेख करत महबुबा मुफ्ती म्हणाल्या कर्नाटकने दाखवून दिलंय की यांच्या (सत्ताधाऱ्यांच्या) संस्थांच्या ताकदीपेक्षा (ईडी-सीबीआय) लोकांची ताकद अधिक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बंगळुरूत एका कार्यक्रमात महबुबा मुफ्ती म्हणाल्या ९० च्या दशकाच्या सुरुवातीला मी येथे एक वर्षापेक्षा अधिक काळ राहिले आहे. गेल्या पाच वर्षाय येथे (कर्नाटकात) द्वेष आणि लोकांना फोडण्याचं राजकारण केलं गेलं. त्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेला मोठा फटका बसला आहे. मला खात्री आहे, सिद्धरामय्या आणि त्यांचं सरकार या जखमा भरून काढेल.

महबुबा मुफ्ती म्हणाल्या, ‘आम्ही जम्मू-काश्मीरचे लोक या फॅसिस्ट शक्तींचा पहिला बळी ठरलो. आमच्या राज्यात मुस्लीम बहुसंख्य असूनही भारताच्या विचारसरणीचा आम्ही अवलंब केला. आम्हाला वाटत होतं आमच्या जीवाचं रक्षण होईल. आमचं राज्य भारतीय राष्ट्रवादाचा आत्मा होतं. परंतु २०१९ पासून आम्ही त्या अधिकारांपासून वंचित आहोत. काश्मीरमधील समस्या वाढल्या आहेत. आपण विचित्र टप्प्यातून जातोय, याची कल्पना अनेकांना नाही.

हे ही वाचा >> नरेंद्र मोदींचं पापुआ न्यू गिनीत जंगी स्वागत, पंतप्रधान जेम्स मरापेंनी मोदींच्या पाया पडून घेतले आशीर्वाद

मुफ्ती म्हणाल्या की, सुरक्षेच्या नावाखाली काश्मीरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. ईडी आणि इतर संस्था अशा प्रकारचे सर्च ऑपरेशन राबवत आहेत आणि त्याद्वारे सामान्य नागरिकांना त्रास देत आहेत. दिल्लीतल्या लोकांना जागं करावं लागेल. कारण भारतीय जनता पार्टी कोणत्याही विरोधी पक्षाला सोडणार नाही. विरोधी पक्षांचं सरकार ते हायजॅक करत नाहीत किंवा त्यांचे आमदार खरेदी करणार नाहीत तोवर ते थांबणार नाहीत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mehbooba mufti says i will not contest assembly election till article 370 restored asc
Show comments