भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) अग्नी आणि पृथ्वी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रांच्या यशस्वी चाचण्या घेतल्यानंतर तसेच पोखरण येथील दुसऱ्या अणुचाचण्यांनंतर अब्दुल कलाम यांचे नाव भारताचे ‘मिसाइल मॅन’ म्हणून सर्वतोमुखी झाले.
देशाने संरक्षणाच्या बाबतीत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनावे म्हणून १९८२-८३ सालच्या दरम्यान हा कार्यक्रम हाती घेण्यात आला. तत्पूर्वी कलाम भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) एसएलव्ही-३ या उपग्रह प्रक्षेपक कार्यक्रमाचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. क्षेपमास्त्रनिमिíती कार्यक्रम हाती घेतल्यानंतर त्यांना संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळेचे (डीआरडीएल) चे संचालक म्हणून नेमून एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाची सूत्रे त्यांच्या हाती देण्यात आली. या कार्यक्रमात संरक्षण दले, इस्रो, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) अशा अनेक संस्थांचा सहभाग होता. त्या अंतर्गत जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे पृथ्वी हे लघु पल्ल्याचे (१५० ते २५० किमी)े, अग्नी हे मध्यम पल्ल्याचे (१५०० ते २५०० किमी) क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारे लघु पल्ल्याचे (९ किमी) त्रिशुळ, जमिनीवरून हवेत मारा करणारे मध्यम पल्ल्याचे (२५ किमी) आकाश आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे रणगाडाभेदी (४ किमी) नाग अशी क्षेपणास्त्रे विकसित करम्याचे उद्दिष्ट होते. प्रथम ती वेगवेगळी विकसित करम्याचा प्रस्ताव होता. मात्र नंतर तत्कालीन संरक्षणमंत्री आर. वेकटरमन यांनी ती एकाच वेळी विकसित करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १९८८ साली पृथ्वी आणि आणि १९८९ साली अग्नीची यशस्वी चाचणी घेण्यात आली आणि हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या देशांच्या पंक्तीत विराजमान झााला.
हे संवेदनशील तंत्रज्ञान भारताला मिळू नये म्हणून जगातील बडय़ा महासत्तांनी आणि ‘मिसाइल टेक्नॉलॉजी कंट्रोल रीजिम’ (एमटीसीआर) या करारातील देशांनी बरेच अडसर निर्माण केले. त्या सर्व अडचणींवर भारताने मात करत स्वत:च्या बळावर भारताने हे तंत्रज्ञान हस्तगत केले. त्यानंतर पोखरण येथे झालेल्या दुसऱ्या अणुचाचण्यांमध्येही कलाम यांचे मोठे योगदान होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही किस्से आणि आठवणी..
जगात क्षेपणास्त्रांचा प्रसार होण्याच्या कित्येक वर्षे आधी म्हणजे दुसऱ्या महायुद्धात अॅडॉल्फ हिटलरच्या नाझी जर्मनीत वेर्नर फॉन ब्रॉन आणि वॉल्टर डॉर्नबर्गर या दोन शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली ‘व्ही-१’ आणि ‘व्ही-२’ (व्हेंजन्स वेपन) ही पहिली क्षेपणास्त्र बनवून ती ब्रिटनवर डागलीही होती. महायुद्धाच्या समाप्तीनंतर वेर्नर फॉन ब्रॉन आणि त्यांचे अनेक शास्त्रज्ञ अमेरिकेत गेले आणि नासाच्या कार्यक्रमात महत्त्वाची भूमिका बजावली. हेच वेर्नर फॉन ब्रॉन नंतर भारतात येऊन इस्रोला भेट दिली होती. त्यावेळच्या भेटीचा किस्सा कलाम यांनी त्यांच्या अग्निपंख या पुस्तकात सांगितला आहे. ब्रॉन यांनी भारताच्या संशोधकांचे कौतुक करून आपल्या कार्यक्रमात काही सूचना केल्या होत्या. एसएलव्ही-३ चे तळाचा व्यास आणि उंचीचे गुणोत्तर थोडे अधिक असल्याचे ब्रॉन यांनी सांगितले होते. नंतर भारताने त्यानुसार बदल केले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Missile man dr apj abdul kalam