Racheal Kaur: कामावर वेळेत पोहचण्यासाठी लाखो लोक कार, बसेसपासून ते मेट्रो आणि शेअर्ड टॅक्सीपर्यंतच्या विविध वाहतुकीच्या साधनांचा वापर करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असलेली दोन मुलांची आई असलेली मलेशियातील भारतीय वंशाची एक महिला, कामावर वेळत पोहचण्यासाठी दररोज सकाळी चार वाजता उठून ४०० किलो मीटर प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. या महिलेचे नाव राहेल कौर असे असून, त्या एअरएशियाच्या फायनान्स ऑपरेशन्स डिव्हिजनमध्ये असिस्टंट मॅनेजर आहेत. राहेल कौर यांच्या प्रवासाच्या पद्धतीबद्दल सविस्तर माहिती देणाऱ्या मुलाखतीनंतर त्यांनी सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, मलेशियातील पेनांग से सेपांग हे अंतर ४०० किलोमीटर इतके आहे. त्या घरून कार्यालयात जाऊन माघारी येण्यासाठी दररोज ८०० किलोमीटर इतका विमान प्रवास करतात.
“मला ११ आणि १२ वर्षांची दोन मुले आहेत. ती जसजशी मोठी होतील तसतसे मला त्यांच्यासाठी अधिक वेळा घरी घालवण्याची गरज भासत आहे. माझ्या या प्रवासामुळे, मी दररोज घरी परतू शकते आणि रात्री त्यांना पाहू शकते”, असे कौर यांनी स्पष्ट केले. याबाबत सीएनए इनसायडरने वृत्त दिले आहे.
वर्क लाइफ बॅलेन्स
पूर्वी, कौर त्यांच्या ऑफिसजवळ क्वालालंपूरमध्ये भाड्याने राहायच्या आणि आठवड्यातून फक्त एकदाच त्यांच्या मुलांकडे पेनांगला यायच्या. यामुळे, त्यांचे काम आणि आयुष्यातील संतुलन बिघडले होते. २०२४ च्या सुरुवातीला, त्यांनी दररोज घरून कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी विमान प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला, या निर्णयामुळे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात चांगले संतुलन साधता आले.
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कौर यांनी खुलासा केला की, त्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पहाटे ४:०० वाजता उठतात आणि ५:५५ वाजताची फ्लाइट पकडण्यासाठी सकाळी ५:०० वाजता विमानतळासाठी निघतात. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, त्या विमानात बसतात आणि सकाळी ७:४५ वाजता त्यांच्या ऑफिसमध्ये पोहोचता. कार्यालयातील काम संपवणून त्या पुन्हा रात्री ८:०० वाजता घरी पोहचतात.
वर्क फ्रॉम होमपेक्षा…
राहेल कौर यांचा कामाच्या ठिकाणाजवळ भाड्याने राहण्यासाठी असलेल्या निवासस्थानाच्या खर्चापेक्षा दैनंदिन विमान प्रवास अधिक किफायतशीर आहे. या नवीन दिनचर्येमुळे त्यांच्या पैशांची बचत होते. कौर यांनी नमूद केले की, त्यांना पूर्वी दरमहा अंदाजे ४२,००० खर्च यायचा, परंतु आता त्यांचा खर्च दरमहा अंदाजे २८,००० पर्यंत कमी झाला आहे.
कौर यांना वाटते की, ही व्यवस्था घरून काम करण्यापेक्षा अधिक प्रभावी आहे. त्या म्हणाल्या, “आपल्या आसपास जेव्हा लोकं असतात तेव्हा तुम्ही समोरासमोर संवाद साधू शकता. त्याचबरोबर कामे पूर्ण करणे सोपे होते.”