उत्क्रांती होत असताना माकडापासून माणूस झाला हे खरं, पण माकडेही माणसासारखे अनेक शिष्टाचार पाळतात बरं का.. त्यांना ते शिकवावे लागत नाहीत. मॅरमोसेट प्रजातीची माकडे ही अति आदराने एकमेकांशी संभाषण करतात, माणूस जसे एकमेकांशी बोलताना शिष्टाचार पाळतो तसे तेही पाळतात असे अभ्यासात दिसून आले आहे. या माकडांना आपण नेमके केव्हा बोलायचे आहे किंवा मध्येच चोंबडय़ासारखे बोलायचे नाही हे पण कळते. किमान ३० मिनिटे ते एकमेकांना पुरेसा वेळ देत असे संभाषण करू शकतात. मॅरमोसेट माकडे ही जगातील सर्वात छोटी माकडे असली तरी ती बुद्धिमान आहेत. त्यांची लांबी फक्त आठ इंच असते.
प्रिन्स्टन विद्यापीठातील आसिफ गझनफर यांनी सांगितले, की मॅरमोसेट माकडे ज्या अदबीने संभाषण करतात, किंबहुना त्यांच्यात एकमेकांविषयी जी सहकार्याची भावना असते ती पाहून आम्हालाच आश्चर्य वाटले. मानवी संभाषण जसे असते तसेच संभाषण त्यांच्यात होते व पक्षी, बेडूक किंवा वटवाघळे यांच्यातील प्रणराधनासाठीच्या किंवा प्रादेशिक संरक्षणाच्या उद्दिष्टाने केलेल्या संभाषणापेक्षा ते फार वेगळे असते.
ही माकडे माणसाप्रमाणे कुणाशीही बोलायला उत्सुक असतात, शिवाय त्यात कुठलाही अडथळा नसतो, विशिष्ट हेतू नसतो. मॅरमोसेट ही अतिशय वेगळी माकडे असून संशोधकांच्या मते चिम्पांझी व इतर मोठय़ा माकडांप्रमाणे ही छोटी माकडे जास्त शहाणी असतात व ते दुसऱ्या माकडांनाही बोलण्याची संधी देत असतात किंवा मध्येच दुसऱ्यांचे संभाषण सुरू असताना त्यात नाक खुपसत नाहीत. गझनफर व डॅनियल ताकाहाशी यांच्या मते मॅरमोसेट माकडे हे एकमेकांत खूप स्वारस्य दाखवतात, जशी माणसेही संभाषणाच्या वेळी दाखवतात. ते एकमेकांशी मैत्री करतात. विशिष्ट आवाज काढून प्राथमिक संवाद सुरू करतात.
 मॅरमोसेट माकडे जेव्हा गर्भाशयात असतात तेव्हा त्यांचा आईवडिलांशी संपर्क कसा असतो किंवा ते कसा संवाद साधतात यावरही संशोधन चालू आहे. त्यातून मानवी संभाषणातील काही त्रुटी दूर करण्यासही मदत होईल असे गझनफर यांचे म्हणणे आहे. सेल प्रेस बायॉलॉजी करंट बायॉलॉजी या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

देवाणघेवाणीचे तत्त्व
संभाषणात देवाणघेवाणीचे तत्त्व असते तसेच ते स्वयंनियंत्रित पद्धतीने ते वापरत असावेत असे वैज्ञानिकांना वाटते. जर मॅरमोसेट माकडांना एखाद्या खोलीच्या विरुद्ध बाजूंना उभे केले व ते एकमेकांचा आवाज ऐकू शकत असतील तर त्यांचे संभाषण कशाप्रकारे चालते याचा उलगडा वैज्ञानिकांनी केला आहे. ते एकमेकांशी एकाच वेळी बोलायला सुरुवात करीत नाहीत. ते एकाने प्रतिसाद दिल्यानंतर पाच सेकंद थांबून मगच बोलतात. संभाषणाचे शिष्टाचार ते पाळतात असा याचा अर्थ आहे.