देशात करोनाचं संकट गडद झालं आहे. त्यात मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस नकोसे विक्रम प्रस्थापित करत असल्याने प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यात करोनामुळे अनेक पालकांचा जीव जात असल्याने लहान मुलांचा प्रश्न ऐरणीवर पडला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेतल मध्य प्रदेश सरकारनं पुढाकार घेतला आहे. करोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मदतीचा हात पुढे केला केला आहे. अनाथ मुलांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा मध्य प्रदेश सरकारने केली आहे. त्याचबरोबर या मुलांची मोफत शिक्षणाची जबाबदारीही सरकार उचलणार आहे.

‘करोनामुळे आई वडील गमवले असून घरात कमवतं कोणच नसेल अशा कुटुंबांना प्रति महिना ५ हजार रुपये पेन्शन दिलं जाईल. त्याचबरोबर मुलांना मोफत शिक्षणही दिलं जाणार आहे. तसेच ज्या कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशा कुटुंबांना मोफत रेशन दिलं जाईल. त्याचबरोबर कुटुंबांना सरकारच्या हमीवर कर्जही दिलं जाईल’, असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीस परवानगी

मध्य प्रदेशमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा वाजले आहेत. दर दिवशी करोनाच्या ८ हजार रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. असं असलं तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत १४ टक्के रुग्ण कमी झाल्याचं आकडेवारीतून दिसत आहे. मध्य प्रदेशात करोना रुग्णांची एकूण संख्या ७ लाखांच्या पार गेली आहे. करोनामुळे आतापर्यंत एकूण ६ हजार ६७९ जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी इंदौरमध्ये १५९७, भोपाळमध्ये १३०४, ग्वालियरमध्ये ४९२, जबलपूरमध्ये ६६६, रुग्णांची नोंद झाली आहे.