Kangana Ranaut on Bangladesh Political Crisis: बांगलादेशच्या राजकारणात गेल्या काही दिवसांत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर शेख हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला, इतंकच नाही तर त्यांना देशही सोडावा लागला. बांगलादेशमधील या राजकीय भुकंपाबद्दल अभिनेत्री व लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (बांगलादेशमध्ये राजकीय अस्थिरतेबद्दलच्या बातम्या वाचा एका क्लिकवर)
कंगना रणौत यांनी एक्सवर पोस्ट करत बांगलादेशमधील राजकीय परिस्थितीवर मत मांडलं आहे. त्यांनी एक्सवर शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देश सोडला यासंदर्भातील एक बातमी शेअर केली व लिहिलं.
“आपल्या सभोवताली असलेल्या सर्व इस्लामिक प्रजासत्ताक देशांची मातृभूमी भारत आहे. बांगलादेशच्या माननीय पंतप्रधानांना भारतात सुरक्षित वाटतंय याचा आम्हाला अभिमान आहे, पण जे भारतात राहून विचारत असतात की हिंदू राष्ट्र का? रामराज्य का? तर आता ते स्पष्ट झालंय!!!
मुस्लीम देशांमध्ये कोणीही सुरक्षित नाही, अगदी मुस्लीम सुद्धा नाही. अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्रिटनमध्ये जे काही घडतंय ते दुर्दैवी आहे.
आम्ही नशीबवान आहोत की आम्ही रामराज्यात राहत आहोत. जय श्री राम,” असं कंगना रणौत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
![Kangana ranaut on bangladesh sheikh haseena](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/08/Kangana-ranaut-on-bangladesh-sheikh-haseena.jpg?w=601)
देश सोडल्यावर भारतात आल्या शेख हसीना
बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्यानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी सोमवारी (५ ऑगस्ट) पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आंदोलक निवासस्थानाकडे पोहोचल्याने शेख हसीना यांनी देश सोडला. तिथून त्या बांगलादेशच्या वायूसेनेच्या विमानाने गाझियाबादमधील भारतीय वायूसेनेच्या हिंडन एअरबेसवर पोहोचल्या. याठिकाणी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोवाल यांची भेट घेतली. शेख हसीना या भारतमार्गे लंडनला जाणार आहेत. भारतीय वायू सेना यामध्ये त्यांची मदत करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.
बांगलादेशमध्ये चालू असलेल्या हिंसाचारात १०० पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला आहे. आंदोलकांनी शेख हसीना यांचं कार्यालयही जाळलं आहे. हसीना यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेच्या लष्करांने प्रशासनावर तात्पुरता ताबा घेतला आहे. आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं. यानंतर सध्या बांगलादेशमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.