Myanmar earthquake : म्यानमारला एका दिवसांपूर्वीच शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले आहेत, ज्यामध्ये एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर पुन्हा एकदा शनिवारी दुसरा एक ५.१ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. युनायटेड स्टेट जिओलॉजिकल सर्वे (USGS)ने याबद्दल माहिती दिली आहे.
भूकंपाचे धक्के दुपारी २.५० वाजता म्यानमारची राजधानी नायपीडाव जवळ १० किमीच्या खोलीवर बसले अशी माहिती USGS ने दिली आहे. शनिवारी झालेल्या भूकंपामुळे किती नुकसान झाले तसेच यामध्ये जीवितहानी किती झाली याची माहिती अद्याप मिळालेली नाही. शुक्रवारी देखील याच ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले होते. नायपीडाव शहरातील बहुतेक भागातील बंद पडलेली वीज, फोन आणि इंटरनेट सेवा खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचे काम अधिकाऱ्यांकडून केले जात असतानाच पुन्हा भूकंपाचे हादरे बसले.
म्यानमारला ७.७ रिश्टर स्केलच्या शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसला आणि त्यानंतर अवघ्या ११ मिनिटांत दुसरा ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. ज्यामुळे देशभरातील इमारती, पूल, ऐतिहासिक वास्तू, रस्ते आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
प्रशासनाने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार या भूकंपात किमान १,००२ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २,३०० हून अधिक जखमी झाले आहेत. मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांकडून ढिगाऱ्यातून मृतदेह बाहेर काढले जात आहेत. यादरम्यान लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारने मृतांची संख्या आणखी वाढू शकते असे म्हटले आहे. तर USGC ने म्यानमारमध्ये मृतांची संख्या १० हजारपर्यंत जाऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे.
म्यानमारच्या शेजारील देश थायलंडमध्ये ही भूकंपाने इमारती हादरल्याचे पाहायला मिळाले. तसेच बँकॉकमध्ये एक बांधकाम सुरू असलेली गगनचुंबी इमारत देखील कोसळली. येथे किमान नऊ जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाची कंपने शेजारील देशांमध्येही जाणवली. कोलकाता आणि इंफाळमध्ये सौम्य कंपने जाणवली होती. बांगलादेशमध्ये ढाका, चितगावसह विविध ठिकाणी धक्के जाणवले. चीनमध्ये युनान, सिचुआन प्रांतातही धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले.
सर्वतोपरी मदतीसाठी भारत तयार मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार व थायलंडमधील विनाशकारी भूकंपाबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारत दोन्ही देशांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. मदतीसाठी अधिकाऱ्यांना सज्ज राहण्यास सांगितले असून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला दोन्ही देशांच्या सरकारांशी संपर्कात राहण्यास सांगितले आहे, असे मोदी म्हणाले.