म्यानमार सैन्याकडून त्यांच्या जमिनीवरुन भारतविरोधी बंडखोर कारवाया करणाऱ्या गटांविरोधात मोठी कारवाई केली जात आहे. सरकारमधील सूत्रांनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "म्यानमारमध्ये छावणी उभारुन भारतविरोधी कारवाया करणाऱ्या बंडखोर गटांवर म्यानमारच्या लष्कराने सुरक्षा यंत्रणांनी कारवाई केली आहे". दरम्यान भारतीय यंत्रणाही म्यानमारमधील सुरक्षा यंत्रणांच्या संपर्कात आहेत. "काही दिवसांपूर्वी पिपल्स लिबरेशन आर्मीकडून (PLA) आसाम रायफल्सचे कर्नल आणि त्यांच्या कुटुंबाची हत्या करण्यात आली होती. त्यामुळे PLA तसंच यासारख्या दहशतवादी गटांवर कारवाई करण्यासाठी भारतीय यंत्रणा म्यानमारमधील यंत्रणांच्या संपर्कात आहेत," असंही त्यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे भारतीय लष्करदेखील म्यानमारमधील लष्कराच्या संपर्कात असून नुकतंच भारताविरोधी बंडखोरांना भारतीय यंत्रणांकडे सोपवण्यात आलं आहे. विशेष विमानाने या पाच जणांना आणण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. या बंडविरोधी गटांमुळे किती जणांना जीव गमवावा लागला आहे याची माहिती अद्याप मिळालेली नाही. गतवर्षी १३ नोव्हेंबरला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. यामध्ये आसाम रायफल्सच्या कमांडिंग अधिकाऱ्याचा समावेश होता. ४६ आसाम रायफल्सचे कमांडिग ऑफिसर कर्नल विप्लव त्रिपाठी यांच्यासह त्यांचा मुलगा, पत्नी आणि इतर चार जवानांना भारत-म्यानमार सीमेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. याआधी भारताने डोग्रा रेजिमेंट बटालियचे २० जवान हल्ल्यात शहीद झाल्यानंतर म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला होता.