Narendra Modi in Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली. पाकिस्तानचे मनसुबे कधीच पूर्ण होऊ देणार नाही, अशी ग्वाही देताना त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनाही इशारा दिला आहे. ते कारगिल येथूनच बोलत होते.

“कारगिल विजय दिवस आम्हाला सांगतो की राष्ट्रासाठी दिलेलं बलिदान अमर होतात. दिवस, महिने, वर्षे ,शतके जातात, परिस्थिती बदलते पण राष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची बाजी लावणाऱ्यांची नावे कायम अमर राहतात. हा देश आमच्या लष्कराच्या पराक्रमी महानायकांचा सदा सर्वदा ऋणी आहे. हा देश त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे. माझं सौभाग्य आहे की कारगिल युद्धाच्या वेळी मी देशाचा सामान्य नागरिक म्हणून आपल्या सैनिकांच्या मध्ये होतो”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

हेही वाचा >> Kargil Vijay Diwas: वीर जवान सलाम तुमच्या बलिदानाला! कारगिल विजय दिनानिमित्त Facebook आणि WhatsApp वर पाठवा ‘हे’ खास संदेश

“मला आठवतंय कशा पद्धतीने आमच्या लष्कराने एवढ्या उंचीवर, एवढं कठीण युद्ध ऑपरेशन लढलं होतं. मी देशाला विजयी करणाऱ्या अशा सर्व शूरवीरांना आदरपूर्वक प्रणाम करतो. मी शहीदांना नमन करतो की ज्यांनी कारगिलमध्ये मातृभूमीच्या रक्षणासाठी आपलं सर्वोच्च बलिदान दिलं. कारगिलमध्ये आम्ही, फक्त युद्ध जिंकलं नव्हतं तर आम्ही सत्य, संयम आणि सामार्थ्याचा अद्भूत परिचय दिला होता”, असंही ते म्हणाले. (Narendra Modi in Kargil Vijay Diwas)

दहशतवाद्यांचे मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत

“तुम्हाला माहिती आहे की भारत तेव्हा शांततेसाठी प्रयत्न करत होता. त्या बदल्यात पाकिस्तानने पुन्हा एकदा आपला अविश्वासू चेहरा दाखवला. परंतु, सत्याच्या समोर असत्य आणि आतंक्यांचा पराभव झाला. पाकिस्तानने जेवढे दुप्रयास केले त्या सर्वांना चारी मुंड्या चीत केले. परंतु पाकिस्तानने आपल्या इतिहासातून काहीच धडा घेतला नाही. त्यांनी आतंकवाद्याच्या सहाय्याने प्रासंगिक राहण्याचा प्रयत्न केला. आज मी जेव्हा त्या जागेतून बोलत आहे, जिथे दहशतवाद्यांना माझा आवाज थेट ऐकू जात आहे. मी दहशतवाद्यांना सांगू इच्छितो की त्यांचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत”, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.