लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्ष वेगवेगळ्या घोषणा करत आहेत, आश्वासनं देत आहेत. अशातच काँग्रेसने ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी समाजमाध्यमांवरून या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत काँग्रेसने गरीब महिलांना दर वर्षी एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. यासह काँग्रेसने म्हटलं आहे की, शासकीय नियुक्त्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा दिला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या योजनांची घोषणा करताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, महिलांसाठी योजनांची घोषणा करण्यापूर्वी आम्ही शेतकरी, कष्टकरी आणि युवकांसाठीच्या योजनांची घोषणा केली आहे. आमची गॅरंटी (हमी) म्हणजे पोकळ आश्वासनं किंवा नुसती वक्तव्ये नाहीत, हे सांगण्याची गरज नाही. आमची आश्वासनं म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे. आश्वासनं पूर्ण करण्याचा आमचा विक्रम आहे. १९२६ पासून आम्ही प्रत्येक वेळी दिलेली आश्वासनं पूर्ण करत आलो आहोत. आमचे विरोधक जेव्हा जन्मालादेखील आले नव्हते तेव्हा आम्ही जाहीरनामे बनवत होतो.

काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या योजना

१. महालक्ष्मी गॅरंटी : या योजनेंतर्गत गरीब कुटुंबांमधील महिलेला दरवर्षी १ लाख रुपयांची मदत केली जाईल.
२. अर्धी लोकसंख्या – पूर्ण अधिकार : या योजनेंतर्गत केंद्र सरकार शासकीय नियुक्त्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा देईल.
३. शक्तीचा सन्मान : या योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मध्यान्ह भोजन कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातील केंद्र सरकारचं योगदान दुप्पट केलं जाईल.
४. अधिकार मैत्री : या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये महिलांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरुक करणे आणि त्यांना मदत करण्यासाठी एका पॅरा लीगल असिस्टन्स म्हणजेच कायदेविषयक सहाय्यकाची नियुक्ती केली जाईल.
५. सावित्रीबाई फुले वसतीगृह : सर्व जिल्हा मुख्यालयांमध्ये काम करणाऱ्या महिलांसाठी कमीत कमी एक वसतीगृह उभारलं जाईल. संपूर्ण देशातील या वसतीगृहांची संख्या दुप्पट केली जाईल.

हे ही वाचा >> राजकीय पक्षांनी २२,२१७ पैकी २२,०३० निवडणूक रोखे वटवले, सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर SBI ची माहिती

काँग्रेसकडून लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

काँग्रेसने मंगळवारी (१२ मार्च) त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत एकूण ४३ उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भाजपाने गेल्या आठवड्यात त्यांच्या लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीत भाजपाने एकूण १९५ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसने शुक्रवारी (८ मार्च) आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत एकूण ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुलनाथ यांना छिंदवाडामधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. भाजपातून काँग्रेसमध्ये आलेल्या राहुल कस्वान यांना चुरू मतदारसंघातून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं आहे. यासह जोरहाटमधून गौरव गोगोई, सिलचरमधून सुरज्या खान, जालौरमधून अशोक गहलोत यांचे पुत्र वैभव गहलोत यांना उमेदवारी दिली आहे. या ४३ पैकी १३ उमेदवार ओबीसी आहेत. दुसऱ्या यादीनुसार काँग्रेसने अनुसूचित जातींमधील १०, अनुसूचित जमातींमधील ९, जनरल ९ आणि एक मुस्लीम उमेदवार दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nari nyay guarantee congress 5 promises to women empowerment ahead of lok sabha polls asc