Nawaz Sharif on PM Modi SCO Summit 2024 : पाकिस्तानमध्ये आयोजित एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) शिखर परिषदेच्या पूर्वसंध्येला पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारत व पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. भारत व पाकिस्तानचे संबंध सुधरायला हवेत, असं मत त्यांनी मांडलं. शरीफ म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एससीओ शिखर परिषदेत आले असले तर बरं झालं असतं. पाकिस्तानमध्ये आज व उद्या (१५, १६ ऑक्टोबर) एससीओ शिखर परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेसाठी भारत सरकारने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानला पाठवलं आहे.

नवाझ शरीफ म्हणाले, “मी नेहमीच भारत-पाकिस्तानचे संबंध सुधारण्याचं समर्थन केलं आहे. मला आशा आहे की एससीओ परिषदेद्वारे आम्हाला उभय देशांचे संबंध सुधारण्याची संधी मिळेल. मात्र या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आले असते तर खूप चांगलं झालं असतं. मला आशा आहे की आम्ही लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटू, एकत्र बसून चर्चा करू”. जिओ न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

नवाझ शरीफ यांनी याआधी देखील उभय देशांचे संबंध सुधारण्यावर भाष्य केलं होतं. दरम्यान, मोठ्या कालावधीनंतर लंडनहून पाकिस्तानला परतलेल्या नवाझ शरीफ यांनी म्हटलं होतं की “आमचा देश जगभरातील अनेक देशांकडून पैसे मागतोय. दुसऱ्या बाजूला भारत मात्र चंद्रावर पोहोचला आहे. भारताच्या तिजोरीत आजमितीस ६०० अब्ज डॉलर्स आहेत. भारत जी-२० परिषदेचं यजमानपद भूषवतोय. मात्र पाकिस्तान एकेक अब्ज डॉलर्ससाठी चीन व अरब राष्ट्रांसह जगभरातील इतर देशातील लोकांकडे पैसे मागतोय.

भारत पाकिस्तानशी द्विपक्षीय चर्चा करणार का? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले…

एका बाजूला पाकिस्तानमधील विरोधी पक्षांमधील नेते पाकिस्तानमधील सरकारला भारताशी चर्चा करण्याचा सल्ला देत आहे. मात्र तिथलं सरकार त्यास अनुकूल नाही. त्याचबरोबर, भारतालाही अशा द्विपक्षीय चर्चांमध्ये रस नसल्याचं परराष्ट्रमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आपण पाकिस्तान दौऱ्यामध्ये कोणाशीही द्विपक्षीय चर्चा करणार नाही असं स्पष्ट केलं आहे.जयशंकर यांच्या रूपाने तब्बल नऊ वर्षांनी भारताचे परराष्ट्रमंत्री पाकिस्तानला गेले आहेत. दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे या दौऱ्यात ते पाकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. मात्र, आपण तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहोत, द्विपक्षीय चर्चेसाठी नाही, असे जयशंकर यांनी आधीच स्पष्ट केलं आहे.