राज्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दुष्काळात तडफडणा-या लोकांकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ नाही. माझा नातू रोहितने नगरच्या कर्जतमध्ये पाण्याचे टँकर दिले आहेत. हे काम सरकारचं आहे. मात्र हे सरकार या गोष्टीवर अदयाप गंभीर नाही. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याचं आमचं काम आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीच्या उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची जाहीर सभा शुक्रवारी निरा – पुरंदर येथे पार पडली. शरद पवार म्हणाले, या देशात काही लोक जागृत असतात. आपल्या प्रश्नांची मांडणी करतात. त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही परंतु त्यांनी दुसर्याच्या हिताचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला पाहिजे. हे आजचे सरकार मात्र शेती व शेतकरी यांच्यामध्ये दुर्लक्ष करणारं आहे.
मी सत्तेत असो किंवा सत्तेत नसो माझा श्वास असेपर्यंत शेतकरी वर्गाच्या पाठीशी राहणार, असे त्यांनी सांगितले. पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टिकेला पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले. ज्याला कुटूंब नाही त्यांना काय कळणार कुटुंब म्हणजे काय असते असा टोलाही लगावला.