फेब्रुवारी महिन्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय न्याय संहिता (द्वितीय सुधारणा) (एनबीएस-२०२३), भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (द्वितीय सुधारणा) (बीएनएसएस-२०२३) व भारतीय साक्ष (द्वितीय सुधारणा) (बीएस-२०२३) अशी तीन विधेयके सादर करून ती मंजूर करून घेतली होती. या तीनही कायद्याची अंमलबजावणी १ जुलैपासून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आजपासून देशभरात नव्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना आज सकाळी दिल्लीत यानुसार पहिला गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीच्या कमल मार्केट पोलीस ठाण्यात एका फेरीवाल्याच्या विरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन भारतीय दंड संहिता (IPC) (१८६०), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) (१८८२) व भारतीय पुरावा कायदा (१८७२) हे कायदे रद्दबातल ठरवून त्याजागी नवे तीन कायदे लागू केले होते. आज सकाळी दिल्लीतील फेरीवाल्याविरोधात भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम २८५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या बाहेरील रस्त्यावर अडथळा निर्माण करण्याच्या कारणावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवे फौजदारी कायदे येतील, अंमलबजावणीचे काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर फेरीवाल्याने रस्त्यात गुटखा आणि पाण्याच्या बाटल्या विकण्याचा स्टॉल लावला होता. त्याच्या स्टॉलमुळे प्रवाशांना चालण्यास अडथळा निर्माण होत होता. सदर स्टॉल हटविण्यात यावा, अशी ताकीद दिल्यानंतरही स्टॉल हटविला न गेल्यामुळे पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला. एनडीटीव्हीने दिलेल्या बातमीनुसार, पोलिसांनी एफआयआरमध्ये सदर फेरीवाला गुटखा, बीडी, सिगारेट विकत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला व्यक्ती पाटणा, बिहारचा असल्याचे सांगितले जाते.

विश्लेषण : नवीन फौजदारी कायदे आधीपेक्षा अधिक कडक? अंमलबजावणी कशी होणार?

आजपासून तीन नवे कायदे लागू होत असताना दिल्लीतील अनेक पोलीस ठाण्याबाहेर तसेच सार्वजनिक ठिकाणी नव्या कायद्याची माहिती देणारे पत्रक लावण्यात आले आहेत. लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. नव्या कायद्यातील तरतुदी आणि त्यानुसार काय शिक्षा असेल, याची माहिती या पत्रकात देण्यात आली आहे.