नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शनिवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये एकाचवेळी सुमारे ४४ ठिकाणी छापे टाकून ‘आयसिस’ या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या १५ जणांना अटक केली. महाराष्ट्रात ‘एनआयए’चे पथक आणि राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या महिन्यात ‘एनआयए’ने ‘आयसिस’ आणि ‘अल सुफा’ या दहशतवादी संघटनांशी संबंधित फरारी महंमद शाहनवाज आलम (रा. झारखंड) याला दिल्लीत अटक केली होती. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. ‘एनआयए आणि ‘एटीएस’च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील पडघा, मीरा रोड तसेच पुण्यासह राज्याच्या वेगवेगळया भागांत छापे टाकून दहा संशयितांना ताब्यात घेतले, तर उर्वरित पाच जणांना बंगळुरूतून अटक करण्यात आली. छाप्यांमध्ये मोठया प्रमाणात बेहिशोबी रोकड, शस्त्रास्त्रे, संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल फोन आणि इतर डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >>> धीरज साहूंच्या घरात नोटांचा पर्वत, खासदाराच्या ‘दौलती’बाबत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, अडचणी वाढल्या

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ‘आयसिस’च्या एका म्होरक्याचा समावेश आहे. तो ‘आयसिस’मध्ये नव्याने भरती झालेल्यांना निष्ठेची शपथ (बायथ) देत असे, अशी माहिती ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने दिली. महाराष्ट्रातील पडघा-बोरिवली, ठाणे, मिरा रोड आणि पुणे, तर कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथे शनिवारी सकाळी हे छापे टाकण्यात आले. छाप्यांदरम्यान दहशतवादाचा प्रचार आणि अन्य दहशतवादी कृत्ये केल्याप्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आल्याचे ‘एनआयए’च्या प्रवक्त्याने सांगितले.

अधिकाऱ्याने सांगितले की, मुख्य आरोपी आणि आयसिसचा महाराष्ट्रातील म्होरक्या साकिब नाचण संघटनेत सामील झालेल्या मुस्लीम तरुणांना  ‘बायथ’ (आयसिसशी इमान राखण्याची शपथ) देत होता. आयसिस विविध राज्यांमध्ये स्थानिक तरुणांचा वापर करून दहशतवादाचे जाळ विणत आहे.

घातपाताचे कारस्थान

‘एनआयए’च्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले आरोपी त्यांच्या परदेशातील म्होरक्याच्या इशाऱ्यांवरून विध्वंस घडवण्यासाठी स्फोटके आणि उपकरणे तयार करण्यासह विविध दहशतवादी कारवायांमध्ये सामील होते. सर्व आरोपी पडघा-बोरिवली येथून कारवाया करीत होते. त्यांनी संपूर्ण भारतात हिंसाचार घडवण्याचा कट रचला होता.

आरोपींच्या कारवाया..

* हिंसक जिहाद, खिलाफत, आयसिस आदी मार्गाचा अवलंब करून शांतता आणि जातीय सलोखा बिघडवण्याचा तसेच सरकारविरुद्ध युद्ध पुकारण्याचा आरोपींचा हेतू होता.

* आरोपींनी ठाणे जिल्ह्यातील पडघा गावाला त्यांच्या ताब्यातील ‘मुक्त क्षेत्र’ घोषित केले होते.

* आरोपी मुस्लीम तरुणांना ‘पडघा तळ’ मजबूत करण्यासाठी त्यांना त्यांच्या मूळ गावातून पडघा येथे स्थलांतरित होण्यास प्रवृत्त करत होते, अशी माहिती ‘एनआयए’ने दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nia arrested 15 members of the banned terrorist organization isis from maharashtra karnataka zws
Show comments