जनता दल (संयुक्त) अर्थात जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे महागठबंधनमधून बाहेर पडणार असल्याची शक्यता गेल्या दोन दिवसांपासून वर्तविण्यात येत आहे. नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी आघाडी करत सरकार स्थापन केले होते. मात्र आता ते पुन्हा एकदा या आघाडीतून बाहेर पडून भाजपाशी हातमिळवणी करणार आहेत. येत्या रविवारी, २८ जानेवारी रोजी त्यांचा भाजपाबरोबर शपथविधी होईल, अशी बातमी राजकीय सूत्रांच्या हवाल्याने द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री तर सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुशीलकुमार मोदी यांनी या राजकीय घडामोडीबाबत बोलताना सांगितले की, बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले जाऊ शकतात. राजकारण हा शक्यतांचा खेळ आहे, असेही ते म्हणाले.

कर्पूरी ठाकूर यांना दिलेल्या ‘भारतरत्न’वरून बिहारमध्ये राजकारण, नितीश कुमार यांची मोदींवर खोचक टीका; म्हणाले…

महागठबंधनमधील जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यात गेल्या काही काळापासून सूप्त संघर्ष सुरू असल्यामुळे नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपाच्या वाटेवर असल्याचे सांगितले जाते. अनेक काळापासून सूप्तावस्थेत असलेला हा संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. त्यातच केंद्र सरकारने दोन दिवसांपूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार घोषित केल्यानंतर हा संघर्ष आणखी टोकाला गेला.

तसेच नितीश कुमार यांनी घराणेशाहीवर केलेल्या टीकेला लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी एक्सवर पोस्ट टाकून तिखट उत्तर दिल्यानंतर दोन्ही पक्षांच्या तणावपूर्ण संबंधात आणखी ठिणगी पडली. रोहिणी आचार्य यांनी वाद उफाळल्यानंतर एक्सवरील पोस्ट डिलीट करण्यात आली.

“नितीश कुमार कधीही पलटी मारू शकतात, भाजपाने त्यांना घेताना विचार करावा”, लोजपच्या चिराग पासवान यांनी दिला इशारा

दरम्यान काँग्रेस पक्षातील सूत्रांनी इंडिया टुडेशी बोलताना सांगितले की, ते बिहारमधील राजकीय परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भाजपाबरोबर अनेक वर्षांपासून असेलल्या चिराग पासवान आणि उपेंद्र कुशवाह यांच्याबद्दल साशंकता दाखवून नितीश कुमार यांना भाजपाकडे परतणे सोपे जाणार नाही, असेही काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभेचे अध्यक्ष आमच्या (राष्ट्रीय जनता दल) बाजूने आहेत, त्यामुळे भाजपाबरोबर जाणे अवघड होईल, असेही काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले.

बिहारच्या विधानसभेतील सदस्यसंख्या २४३ एवढी आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडे ७९ आमदार असून, त्यानंतर दुसऱ्या क्रमाकांवर भाजपाचे ७८ आमदार आहेत. जदयू पक्ष विधानसभेत तिसऱ्या क्रमाकांवर असून त्यांच्याकडे ४५ आमदारांचे संख्याबळ आहे. तर काँग्रेसकडे १९, सीपीआय (एम-एल) कडे १२ आमदार आहेत. सीपीआय (एम) आणि सीपीआयकडे प्रत्येकी दोन आमदार आहेत. हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे चार आमदार आणि एमआयएम पक्षाचा एक आमदार आहे.

२०२० साली बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांनी एनडीएबरोबर निवडणूक लढवली. मात्र २०२२ साली त्यांनी अचानक भाजपाशी काडीमोड घेऊन दुसऱ्यांदा आरजेडी पक्षाशी हातमिळवणी केली होती. त्यानंतर भाजपाचे नेते अमित शाह यांनी नितीश कुमार यांना ‘पलटू’ या नावाने हिणवले होते. आता पुन्हा भाजपाशी युती केल्यास एकाच टर्ममध्ये दोन वेळा यू-टर्न घेण्याचा आरोप त्यांच्यावर होऊ शकतो.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nitish kumar may take oath as jdu bjp governments chief minister on jan 28 said sources kvg