ख्रिस्ती धर्मप्रचारकांची ‘ताकद नसल्यामुळे’ देशात धर्मातराचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता नाही, असे सांगून रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी धर्मातराच्या मुद्दय़ाला शनिवारी पुन्हा तोंड फोडले.
हिंदूंच्या ऐक्यावर भर देताना भागवत यांनी जात आणि भाषा यांचे भेद विसरून हिंदू समुदायाने एकत्र यावे, असे आवाहन केले.
अमेरिकेत आणि युरोपात लोकांचे ख्रिस्तीकरण केल्यानंतर ते लोक (मिशनरी) आता आशियावर नजर ठेवून आहेत. चीन स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवतो, पण तो स्वत:चे ख्रिस्तीकरण होऊ देईल काय?- नाही. मध्यपूर्वेतील देश तेथे धर्मातर होऊ देतील काय?- नाही. त्यामुळे आता भारतच आपल्यासाठी उरला असल्याचे त्यांना वाटते, असे भागवत म्हणाले.
[jwplayer itkTOSml]
मात्र त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. ३०० वर्षांहून अधिक काळ ख्रिस्ती धर्मप्रचारकांनी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करूनही भारताच्या लोकसंख्येपैकी फक्त ६ टक्के लोकांचे धर्मातर होऊ शकले. याचे कारण, त्यांच्याजवळ ताकद नाही, असे भारत सेवा संघातर्फे वनसदा येथे आयोजित विराट हिंदू संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात भागवत यांनी सांगितले.
अमेरिकेतील एका हिंदू उद्योगपतीने अमेरिकेतील एका चर्चचे गणेश मंदिरात, ब्रिटनच्या बर्मिगहॅममधील एका चर्चचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात रूपांतर केल्याचे उदाहरण भागवत यांनी आपला मुद्दा जोरकसपणे मांडण्यासाठी दिले.
ख्रिस्ती धर्मप्रचारकांची त्यांच्या स्वत:च्या देशात अशी परिस्थिती असताना ते आमचे धर्मातर करू इच्छितात; पण त्यासाठी आवश्यक ताकद नसल्यामुळे ते तसे करू शकत नाहीत, यावर त्यांनी भर दिला.
हिंदूंनी आपण कोण आहेत याची, तसेच आपली संस्कृती श्रेष्ठ असल्याची जाणीव ठेवावी. आम्ही सर्व हिंदू आहोत, मात्र आपण स्वत:ची ओळख विसरलो आहोत. आपल्या जाती, भाषा, राज्ये आणि आपण पुजत असलेले देव वेगळे असतील, तरी भारतमातेचे पुत्र असलेले सर्व हिंदू आहेत. त्यामुळे भारताला हिंदुस्तान म्हणतात, असा उल्लेख भागवत यांनी केला.
[jwplayer CJ5r9OHQ]