नवी दिल्ली/मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्यास केवळ चार दिवस उरले असतानाही महाविकास आघाडी आणि महायुतीचे जागावाटप तसेच सर्व उमेदवारांच्या यादीची प्रतीक्षा कायम आहे. ‘उद्या येणार, उद्या चित्र स्पष्ट होणार’ असे सांगून दोन्हीकडील नेते वेळ मारून नेत असले तरी, अजूनही जागावाटपाबाबत मतभेद असल्याचे स्पष्ट होत आहे. नवी दिल्लीत शुक्रवारी काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचेही समजते.

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ शुक्रवारीही कायम होता. तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ८५ जागा लढवण्याचे निश्चित केले असले तरी उर्वरित जागांच्या वाटपावर चर्चेचे गुऱ्हाळ अजूनही सुरू आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात शनिवारी पुन्हा शरद पवार व उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील जागावाटपावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी दिल्लीतील बैठकीनंतर दिली. दिली.

हेही वाचा >>> Rahul Gandhi : महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांवर राहुल गांधी नाराज? नाना पटोले म्हणाले, “आम्ही…”

काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून शुक्रवारी झालेल्या छाननी समितीच्या बैठकीमध्ये ५५ जागांवरील उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. केंद्रीय निवड समितीच्या बैठकीमध्ये २५ उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले गेले. पुढील दोन दिवसांमध्ये काँग्रेसची दुसरी व शेवटची तिसरी यादी जाहीर होईल. गरजेनुसार केंद्रीय निवड समितीची‘ऑनलाइन’ बैठक घेतली जाऊ शकते. छाननी समितीतील काँग्रेसने १०३ जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. मित्र पक्षांसाठी १० जागा सोडल्या जातील. त्यामुळे शिवसेना-ठाकरे गट सुमारे ९५ व राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट सुमारे ८० जागा लढवण्याची शक्यता आहे.

महायुतीतही अनिश्चितता?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या गुरुवारच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांबरोबरच्या बैठकीनंतर महायुतीतील जागावाटप पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत होता. तसेच भाजपची यादी शुक्रवारी सकाळी जाहीर केली जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र, शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत भाजपची यादी जाहीर झाली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ने सात उमेदवारांची नावे जाहीर केली. मात्र, त्यापलिकडे तिन्ही पक्षांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.