अलाहाबाद :  कुंभमेळ्यादरम्यान झालेली आणि ३६ जणांचा बळी घेणारी चेंगराचेंगरी ही प्रशासकीय ढिसाळपणाची परिणती असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. मात्र या दुर्घटनेचे राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केले आहे. कुंभमेळा हा संपूर्ण देशाचा असून घडलेली घटना निश्चितच दुर्दैवी होती, सद्यस्थितीत सुरक्षाव्यवस्था महत्त्वाची आहे, त्यामुळे विरोधकांनी या घटनेकडे राजकीय दृष्टीने पाहू नये, असे यादव यांनी सुचविले. चेंगराचेंगरीतील ३० जखमींना येथील स्वरूप राणी नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना भेटण्यासाठी अखिलेश यादव आले असताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.