पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो झरदारी गुरुवारी भारतात दाखल झाले. भारताचे परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या शिखर परिषदेमध्ये ते सहभागी होणार आहेत. गोव्यातील बेनौलिम येथे ही परिषद होत आहे. पाकिस्तानच्या उच्चपदस्थ नेत्याने भारताला भेट देण्याची २०११ नंतर ही प्रथमच वेळ आहे. तब्बल १२ वर्षांनंतर पाकिस्तानी मंत्री भारतात दाखल झाले आहेत.

हेही वाचा >> पाकिस्तानी नेता बिलावल भुट्टोच्या आजोबांना मुंबई पालिकेने दिली होती जमीन, नेमकं प्रकरण काय?

दहशतवादाच्या मुद्दय़ावरून दोन्ही देशांमधील संबंध ताणलेले असताना भुट्टो भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत पाकिस्तानातील वाद उघड आहेत. या दोन्ही देशातील नेते एकमेकांशी हस्तांदोलन टाळतात. उघड उघड चर्चाही होत नाही. मात्र एससीओचे सदस्य या नात्याने या दोन्ही देशातील परराष्ट्रमंत्री एका व्यासपीठावर आले. परंतु, बिलावल भुट्टो आणि एस. जयशंकर यांच्यात ऑन कॅमेरा कोणतीही चर्चा झाली नाही. व्हिडीओतील दृश्यानुसार, दोघांनी एकमेकांकडे पाहून नमस्कार केला आणि भुट्टोंना पुढे जाण्याचा इशारा दिला.

‘एससीओ परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीसाठी पाकिस्तानी शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी गोव्यात येऊन मला फार आनंद झाला आहे,’ अशी प्रतिक्रिया काल (४ मे) बिलावल भुट्टो यांनी भारतात आगमन झाल्यानंतर पत्रकारांना दिली.

हेही वाचा >> पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुत्तो झरदारी भारत दौऱ्यावर; ‘एससीओ’ सदस्य देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत सहभागी

बिलावल भुत्तो झरदारी यांच्या रूपाने पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तब्बल १२ वर्षांनी भारतात आले आहेत. यापूर्वी २०११ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री हीना रब्बानी खर भारतात आल्या होत्या. सध्या त्या पाकिस्तानच्या परराष्ट्र राज्यमंत्री आहेत. त्यानंतर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळय़ाला उपस्थित राहिले होते. त्यानंतर डिसेंबर २०१५ मध्ये तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला अचानक काही तास भेट दिली होती.