Coromandel Express Accident : ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सर्वाधिक सुरक्षित प्रवास समजला जाणाऱ्या रेल्वे प्रवासातच सर्वाधिक बळी गेल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरलं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अनेक प्रश्न विचारले आहेत. तसंच, त्यांच्या याप्रकरणी सीबीआयला तपासाचे आदेश दिल्याने टीकाही केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्यात आले आहे. यावरून मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोध केला आहे. “सीबीआय गुन्ह्यांचा तपास करण्याकरता आहे, रेल्वे अपघाताची चौकशी करण्याकरता नाही. सीबीआय किंवा इतर कोणीतीही कायदा अंमलबजावणी संस्था, तांत्रिक, संस्थापक आणि राजकीय अपयशांसाठी जबाबदारी निश्चित करू शकत नाही. त्यांच्याकडे रेल्वे सुरक्षा, सिग्नलिंग आणि देखभाल पद्धतींमध्ये तांत्रिक कौशल्याचा अभाव असेल”, असं खरगे यांनी म्हटलं आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चार पानी पत्र लिहिले आहे.

“या प्रकरणाची जबाबदारी कोणीही उचलायला तयार नाही”, अशी टीकाही त्यांनी केली. “रेल्वेमंत्र्यांनी या अपघातामागचे कारण शोधले आहे, तरीही त्यांनी हे प्रकरण सीबीआयला तपासासाठी दिले आहे”, असंही खरगे म्हणाले. २०१६ मध्ये कानपूरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला होता. या अपघातात १५० लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा तत्कालीन रेल्वे मंत्र्यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला याबाबत चौकशीचे आदेश दिले होते, अशी आठवणही खरगे यांनी करून दिली. या अपघातावरून मोदींनी २०१७ च्या निवडणूक रॅलीत देशाला आश्वासन दिले होते की दोषीला कठोरातील कठोर शिक्षा सुनावली जाईल. परंतु, २०१८ मध्ये एनआयएने तपास बंद केल आणि आरोपपत्र दाखल करण्यास नकार दिला. याप्रकरणातील दोषी अद्यापही उजेडात आलेले नाहीत. १५० मृत्यूंना कोण जबाबदार आहे?” असा सवालही त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

हेही वाचा >> ओडिशा रेल्वे अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वीरेंद्र सेहवाग सरसावला; ट्वीट करत म्हणाला, “हा फोटो दीर्घकाळ…!”

ओडिशातील रेल्वे अपघातामुळे सुरक्षेचे पोकळ दावे उघड

खरगे म्हणाले की, “ओडिशातील रेल्वे अपघात हा सर्वांचेच डोळे उघडणारा होता. रेल्वेमंत्र्यांचे सुरक्षेचे पोकळ दावे आता उघड झाले आहेत. या सुरक्षेबाबत सर्वसामान्य प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे या भीषण अपघाताची खरी कारणे शोधून समोर आणणे सरकारचे कर्तव्य आहे. आज, आमच्या प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि बालासोरसारख्या अपघाताची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व रेल्वे मार्गांवर अनिवार्य सुरक्षा मानके आणि उपकरणे बसवण्याला प्राधान्य देणे हे सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे”, असंही ते म्हणाले.

खरगे पुढे म्हणाले, “रेल्वे अधिक प्रभावी, अधिक प्रगत आणि अधिक कार्यक्षम बनवण्याऐवजी, तिला सावत्र आईसारखी वागणूक दिली जात आहे. दरम्यान, सततच्या सदोष निर्णयामुळे रेल्वेचा प्रवास असुरक्षित झाला आहे आणि त्यामुळे आमच्या लोकांच्या समस्या वाढल्या आहेत,” ते म्हणाले.

हेही वाचा >> बालासोरमध्ये अश्विनी वैष्णव यांनी जोडले रेल्वेसमोर हात; Video व्हायरल! देवेंद्र फडणवीस म्हणतात, “तुमच्यासारखे…”

रेल्वेत रिक्त पदे का भरली गेली नाहीत?

आपल्या पत्रात खरगे यांनी पंतप्रधान मोदींना ११ प्रश्न विचारले आहेत. भारतीय रेल्वेत सुमारे ३ लाख पदे रिक्त आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. रेल्वेत ८ हजार २७८ वरिष्ठ पदे रिक्त असल्याचाही दावा या पत्रातून केला आहे. वरिष्ठ पदे रिक्त असल्याने सरकारचा निष्काळजीपणा आणि उदासीनता दिसून येत असल्याचंही ते म्हणाले. नव्वदच्या दशकात १८ लाखांहून अधिक रेल्वे कर्मचारी होते, ते आता सुमारे १२ लाखांवर आले आहेत, त्यापैकी ३.१८ लाख कंत्राटी पद्धतीने काम करतात. रिक्त पदांमुळे SC/ST/OBC आणि EWS मधील लोकांच्या निश्चित नोकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. गेल्या ९ वर्षांत इतक्या मोठ्या संख्येने रिक्त पदे का भरल्या गेल्या नाहीत? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

ते म्हणाले की, रेल्वे बोर्डाने स्वतः कबूल केले आहे की लोको पायलटना कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे जास्त वेळ काम करावं लागत आहे. “लोको पायलट यांच्यावर असलेल्या अतिरिक्त कामाच्या ओझ्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांची पदे अद्याप का भरली गेली नाहीत?” असंही त्यांनी विचारलं.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha train accident congress president kharge writes to pm modi says cbi meant to investigate crimes not railway accidents sgk