Online Passport Portal Shut For 5 Days : पासपोर्टसाठी (पारपत्र) अर्ज करणाऱ्या अर्जदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढील पाच दिवस पासपोर्ट ऑनलाईन पोर्टलची सेवा बंद राहणार आहे. त्यामुळे या काळात नव्या अपॉइमेंट्स दिल्या जाणार नाहीत. तसंच, आधी दिलेल्या अपाइमेंट्स रद्द करून त्यांना पुढच्या तारखा दिल्या जाणार आहेत.

तांत्रिक कामांसाठी २९ ऑगस्ट ते २ सप्टेंबरपर्यंत पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार आहे. या काळात हे पोर्टल नागरिकांसाठी आणि MEA/RPO/BOI/ISP/DoP/Police Authorities यांच्यासाठी बंद राहणार आहे. ३० ऑगस्टसाठी दिलेली अपाइमेंट पुढे ढकलण्यात येईल आणि अर्जदारांना यासंदर्भात कळवण्यातयेईल, असं पासपोर्ट सेवा पोर्टलकडून सांगण्यात आलं आहे.

ही नियमित चालणारी प्रक्रिया असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. “अपॉइंटमेंट्सच्या तारखा बदलण्यासाठी आम्ही आधीच योजना आखून ठेवलेली असते. नागरी सेवासंदर्भातील सेवा खंडित करण्याआधी पूर्वनियोजन केलं जातं. त्यामुळे अपॉइंटमेंट्स रिशेड्युल करणं फारसं आव्हानात्मक नसेल”, असंही परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केलं.

हेही वाचा >> विश्लेषण : भारतीय पासपोर्टची ‘पत’ ढासळली… धनवान भारतीय म्हणूनच परदेशात जातात?

देशभरातील विविध केंद्रामध्ये अपॉइंटमेंट्स घेण्याकरता पासपोर्ट सेवा पोर्टलचा वापर केला जातो. जी तारीख मिळालेली असते त्या तारखेवर अर्जदाराने त्याचे सर्व कागदपत्र घेऊन पासपोर्ट केंद्रावर जायचं असतं. त्यानंतर पोलिसांकडून पडताळणी करून पासपोर्ट अर्जदाराच्या पत्त्यावर पाठवला जातो. साधारण ३०-४५ दिवसांत पासपोर्ट अर्जदारापर्यंत पोहोचवला जातो. तत्काळ सेवेमध्ये काही दिवसांत हा पासपोर्ट पोहोचतो.

मार्च महिन्यात उद्भवली होती समस्या

मार्च महिन्यात पासपोर्ट संकेतस्थळात तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. सर्व्हरमधील बिघाडामुळे ही समस्या झाली होती. पुण्यातील पारपत्र कार्यालयात दररोज सुमारे एक हजार ते बाराशे जणांच्या पारपत्र अर्जांवर कार्यवाही केली जाते. मात्र, संकेतस्थळातील समस्येमुळे अर्जदारांना अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत होत्या. यामुळे हजारो नागरिकांची गैरसोय झाली. पारपत्र कार्यालयाकडून अर्जदारांना याबाबत व्यवस्थित माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली गेली होती.

भारताचे पासपोर्ट किती प्रभावी?

हेन्ली पासपोर्ट निर्देशांकानुसार, जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असूनही भारताची स्थिती तुलनेने फार चांगली नाही. भारत या यादीमध्ये ८२व्या स्थानी आहे. जुलै २०२२ मध्ये भारत ८७व्या स्थानावर होता, तर गेल्या वर्षी जुलैमध्ये भारत ८५व्या स्थानावर होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये भारताने पाच अंकांनी प्रगती करून ८०वे स्थान मिळवले होते. मात्र आता भारताने दोन अंक गमावून ८५वे स्थान मिळविले. भारताचे पारपत्रधारक जगभरातील फक्त ५८ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करू शकतात. गेल्या वर्षी ५९ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेश करण्यास मुभा होती. भारतासह सेनेगल आणि ताजिकिस्तान हे देशही ५८व्या क्रमांकावर आहे. भारताचे महत्त्व आंतरराष्ट्रीय राजकारणात, अर्थकारणात गेल्या काही वर्षांमध्ये वाढू लागल्याचे बोलले जात असले, तरी २०१८ पासून हेन्ली पारपत्र निर्देशांक क्रमांक ८० ते ८७ मध्ये स्थिरावलेला दिसून येतो. व्हिसामुक्त प्रवेश मिळू शकणाऱ्या देशांची संख्याही ५५ ते ६०च्या पलीकडे जाऊ शकलेली नाही. त्या तुलनेत अनेक लहान देश, अविकसित राष्ट्रांनीही भारतापेक्षा वरचे स्थान मिळवले आहे.