ऑक्सिजनसाठी दिल्लीचे प्राण कंठाशी आले आहेत, असं म्हटलं तर अतिशोयक्तीचं ठरणार नाही. करोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असलेल्या दिल्लीत भयंकर परिस्थिती निर्माण झाली असून, ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं दिल्ली हादरलेली असतानाच दिल्लीत नाशिकच्या घटनेच्या स्मृती जाग्या करणारी घटना घडली आहे. ऑक्सिजन प्रेशर कमी झाल्याने एकाच रुग्णालयातील २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दिल्लीत करोनामुळे मृत्यूचं तांडवच सुरू आहे. दिल्लीत ऑक्सिजनअभावी २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये आणखी २५ रुग्णांचा ऑक्सिजनचा दाब कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. रुग्णालय प्रशासनाने या घटनेला दुजोरा दिला आहे. ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने नाशिकमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता. असाच प्रकार जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये घडला आहे. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊन ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने शुक्रवारी रात्री २५ रुग्णांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयाचे डी.के. बालुजा यांनी सांगितलं.

सध्या रुग्णालयात केवळ अर्धा तास पुरेल इतकाचं ऑक्सिजनचा साठा शिल्लक राहिल्याची माहितीही रुग्णालयाने दिली आहे. सध्या २०० रुग्ण उपचार घेत असून, वेळीच ऑक्सिजन मिळाला नाही, तर त्यांचे प्राण जाऊ शकतात अशी भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे.

३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं…

दिल्लीतील सर्वच रुग्णालयांना ऑक्सिजनाचा तुटवडा भेडसावत असून, बात्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी ३५० रुग्णांचे धोक्यात आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. केवळ २५ मिनिटं पुरेल इतकाच ऑक्सिजन साठा रुग्णालयात शिल्लक होता. रुग्णालयाने दिल्ली सरकारला एसओएस संदेश पाठवला. त्यानंतर दिल्ली सरकारकडून तातडीने एक ऑक्सिजन टँकर पाठवण्यात आला. रुग्णालयाला ८ हजार लिटर ऑक्सिजनची गरज असताना केवळ ५०० लिटरच ऑक्सिजन पुरवण्यात आला असून, केवळ १२ तासच पुरेल इतका साठा असल्याचं रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक एससीएल गुप्ता यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ३५० रुग्णांचं मरण तात्पुरतं टळलं अशीच भयावह स्थिती आहे.

Story img Loader