Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट आहे. अशात सतत दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानवर भारताने कडक निर्बंध लादले आहेत. याचबरोबर केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल माहिती देण्यासाठी आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी गुरुवारी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. ही बैठक संपल्यानंतर, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सांगितले की, सरकार जी कोणती कारावाई करेल त्याला विरोधी पक्षांचा पूर्ण पाठिंबा असेल.
दरम्यान भारताने निर्बंध लादल्यानंतर यावर पाकिस्तानकडूनही प्रतिक्रिया आली आहे. त्यांनी म्हटले आहे की, २४ कोटी नागरिकांसाठी जीवनरेखा असल्याचे सांगत, पाकिस्तानने सिंधू जल करार स्थगित करण्याचा भारताचा निर्णय नाकारला आहे. याचबरोबर पाकिस्तानने भारतीय विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र देखील बंद केले आहे आणि सिमला करारासह भारतासोबतचे सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.
Pahalgam Terror Attack Live Updates Today 25 April 2025:
India Pakistan Border: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी करणार पहलगाममधील हल्ल्याच्या ठिकाणाची पाहणी
जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जण मृत्युमुखी पडल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी शुक्रवारी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. यावेळी उत्तर कमांडचे लष्कर प्रमुख लेफ्टनंट जनरल एमव्ही सुचिंद्र कुमार हे देखील लष्करप्रमुखांसोबत उपस्थित आहेत. दरम्यान लष्कर प्रमुख पहलगाम येथील हल्ल्याच्या ठिकाणी भेट देणार आहेत.
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून आता भारताने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात तैनात केली आहे. पाकिस्तानसोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कारण पाकिस्तान याच भागात क्षेपणास्त्र चाचणीची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.
India Pakistan Border: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी १५ कॉर्प्स कमांडरकडून घेतला परिस्थितीचा आढावा
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरला पोहोचले असून, त्यांनी १५ कॉर्प्स कमांडरकडून सुरक्षा परिस्थिती आणि भारताच्या हद्दीत दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईबद्दल माहिती देण्यात आली आहे. याचबरोबर पाकिस्तानी सैन्य नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती, लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
India Pakistan Border: महाराष्ट्रातील २३२ पर्यटक श्रीनगरहून मुंबईला येणार, राज्य सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून जम्मू आणि काश्मीरला गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान महाराष्ट्रातीलही शेकडो पर्यटक सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये अडकले आहेत. या पर्यटकांना परत राज्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. आज दुपारी श्रीनगरहून तिसरे विमान २३२ पर्यटकांना घेऊन मुंबईत पोहचणार आहे.
India Pakistan Border: पाकिस्तानची पुन्हा आगळीक, LOC वर सीमेपलीकडून गोळीबार; भारतीय लष्कराचं चोख प्रत्युत्तर!
पहलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवादी आसिफ शेखच्या घरात स्फोट, पोलीस तपासादरम्यान स्फोट होऊन घर बेचिराख
Pahalgam Terror Attack Live News Updates: "पहलगाम दहशतवादी हल्ला भारताने रचलेला कट", पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्याने ओकली गरळ
जम्मू आणि काश्मीरच्या बैसरन खोऱ्यात २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग असल्याचे नाकारल्यानंतर, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी आता भारतावर आरोप केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ला भारताने रचलेला कट असल्याचे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. आसिफ यांनी पुढे आरोप केला की, हा हल्ला भारतानेच संकट आणि तणावाची खोटी परिस्थिती निर्माण करण्यासाठी घडवून आणला आहे.
जम्मू आणि काश्मीरच्या काही भागांत दहशतवादी असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी बांदीपोरातील कोलनार अजसच्या भागात संयुक्त शोध मोहीम सुरू केली. यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार झाल्याची माहिती, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने दिली आहे.
हा व्हायरल Video नौदल अधिकारी विनय नरवाल व त्यांच्या पत्नीचा नाही, खरे जोडपे आले समोर; म्हणाले, "आम्ही जिवंत आहोत"
Pahalgam Terror Attack Live Updates: राहुल गांधी पहलगाम दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यातील जखमींची घेणार भेट
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज (२५ एप्रिल) जम्मू आणि काश्मीरला भेट देणार आहेत. यावेळी ते पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेणार आहेत. यासाठी राहुल गांधी अनंतनागमधील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जाणार आहेत. मंगळवारी दुपारी दक्षिण काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम शहराजव दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात किमान २६ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.
दहशतवादाविरुद्ध सरकारच्या कारवाईला विरोधकांचा पूर्ण पाठिंबा, सुरक्षा यंत्रणेच्या त्रुटींवरही ठेवलं बोट
नियंत्रण रेषेवरील काही ठिकाणी पाकिस्तानी सैन्याने गोळीबार सुरू केला होता. त्याला भारतीय सैन्याने प्रत्युत्तर दिले असून यामध्ये, कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याची माहिती भारतीय सैन्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Pahalgam Terror Attack Live Updates: हिंदू पाकिस्तानी नागरिकांना दिलेले दीर्घकालीन भारतीय व्हिसा वैध राहणार: परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच जारी केलेले दीर्घकालीन व्हिसा वैध राहणार आहेत. एका प्रसिद्धी पत्रकात, परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा निलंबित करण्याच्या भारत सरकारने निर्णय घेतला आहे. हा निर्णय हिंदू पाकिस्तानी नागरिकांना आधीच जारी केलेल्या दीर्घकालीन व्हिसासाठी लागू होत नाही, ते वैध राहतील."