पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून भारतीय छावण्यांवर गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा करण्याचा प्रकार सुरूच असून सोमवारी बारामुल्ला जिल्ह्यातील उरीमध्ये नियंत्रणरेषेवर करण्यात आलेल्या हल्ल्यात लष्करातील कनिष्ठ अधिकारी शहीद झाला.
श्रीनगर-मुझफ्फराबाद रस्त्यावरील कमान पूलाजवळील भिम छावणीवर पाकिस्तानने हल्ला केला. यामध्ये लष्करातील कनिष्ठ अधिकारी प्रकाश चंद हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरू असतानाचा त्यांचा मृत्यू झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले. प्रकाश चंद हे उत्तराखंडमधील राहणारे होते.
याआधी गेल्या आठवड्यात मंगळवारी रात्री अर्निया, आर. एस. पूरा, रामगढ आणि अखनूर भागातील छावण्यांवर पाकिस्तानी रेंजर्सकडून करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये सीमा सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानी लष्कराच्या हल्ल्यामध्ये भारतीय अधिकारी शहीद झाला. पाकिस्तानी अधिकाऱयांसोबत हॉटलाईनवरून सोमवारी घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा करण्यात आली असल्याचे प्रवक्त्याने सांगितले.