Pakistan : किरकोळ वादातून खून झाल्याच्या अनेक घटना घडताना पाहायला मिळतात. तसेच सोशल मीडियाच्या वापरावरून वाद घडून अनेक गंभीर घटना देखील याआधी अनेकदा पाहायला मिळाल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक घटना पाकिस्तानमध्ये घडल्याची माहिती समोर आली आहे. नव्या पद्धतीची जीवनशैली जगत असल्यामुळे आणि सोशल मीडियाचा वापर केल्यामुळे एका तरुणाने त्याच्याच कुटुंबातील चार महिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पाकिस्तानच्या कराचीमध्ये घडला आहे. यामध्ये त्या तरुणाच्या आईसह बहिणीचाही समावेश आहे.

या तरुणाला त्याच्या कुटुंबातील महिलांनी सोशल मीडिया वापरण्यावर आक्षेप होता. त्यामधून त्याने हे कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी सांगितली आहे. वृत्तानुसार, कराचीमधील लियारी परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये या चार महिलांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांच्या शरीरावर जखमाही आढळून आल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीचे नाव बिलाल अहमद असं असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

हेही वाचा : ‘लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, एक कोटी मिळवा’, करणी सेनेची घोषणा; कारण काय?

दरम्यान, आरोपी अहमदने या घटनेबाबत न्यायालयाला सांगितलं की, त्याची आई, बहीण, भाची आणि मेहुणीचा त्याने गळा चिरला. कारण त्याला सध्याच्या नव्या जीवनशैलीच्या पद्धतीवर आक्षेप होता. तसेच आई, बहीण, भाची आणि मेहुणी यांचे आरोपीशी कायम काहीतरी कारणांवरून कायम भांडण करत होत्या. त्यामुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर होऊन हे कृत्य केल्याचं आरोपी अहमदने सांगितल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

बिलाल हा मानसिकदृष्ट्या अस्थिर आणि अतिपरंपरावादी होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत. तपासादरम्यान, अशीही माहिती समोर आली आहे की, आरोपी बिलाल अहमदचे त्याच्या कुटुंबातील महिलांशी दररोज भांडणे होत असत. तो त्यांना त्यांच्या जीवनशैलीच्या पद्धतीवर आणि सोशल मीडियाच्या वापरावरून सातत्याने रागवत असे. त्याची पत्नीही त्याला तो अतिपरंपरावादी असल्याच्या कारणातून सोडून गेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच सोशल मीडियाचा वापर केल्याने बिलाल हा त्याची आई, बहीण, भाची आणि मेहुणीवर नाराज होता, अशी माहिती त्याने पोलिसांना चौकशीवेळी दिली. तसेच सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केल्यामुळे तो बहीण आणि भाचीवर नाराज होता, अशीही माहिती समोर आली आहे.