Baloch Liberation Army Hijack Pakistan Train : मंगळवारी पाकिस्तानातील अशांत बलुचिस्तान प्रांतात बलुचिस्तान फुटीरतावाद्यांनी सुमारे ५०० प्रवाशांना घेऊन पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसवर हल्ला केला. ही ट्रेन त्यांनी हायजॅक केली आहे. त्यामुळे लष्करासोबत तणावपूर्ण संघर्ष निर्माण झाला. पाकिस्तान सरकारकडून याबाबत फारशी माहिती मिळाली नसली तरी, बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) ने जाफर एक्सप्रेसमधील सुरक्षा दलांसह १८० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवल्याचा दावा केला आहे.

अतिरेक्यांनी २० पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार मारल्याचा दावाही केला आहे. हा हल्ला बीएलएच्या माजिद ब्रिगेडने केला होता, जो बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

ट्रेन हायजॅक कशी केली?

बलुच अतिरेक्यांनी बोगदा क्रमांक ८ वरील रेल्वे ट्रॅक उडवून दिला. त्यामुळे एक्स्प्रेस रुळावरून घसरली. यानंतर दहशतवाद्यांनी जाफर एक्सप्रेसवर गोळीबार केला. यामुळे एक्स्प्रेसचा वेग कमी झाला. दरम्यान, या घटनेत मोटरमन गंभीर जखमी झाला आहे. गोळीबारानंतर बलुचिस्तानमधील अतिरेक्यांनी ट्रेनचा ताबा घेतला. फुटीरतावाद्यांच्या हल्ल्यांच्या चिंतेमुळे बलुचिस्तानमधील ट्रेनमध्ये सामान्यतः सुरक्षा कर्मचारी असतात. पाकिस्तानी सैन्याने जमिनीवर हल्ला आणि हवाई बॉम्बहल्ला करून प्रत्युत्तर दिले आहे. तथापि, अतिरेक्यांनी लष्कराच्या जमिनीवरील कारवाईवर ताबा मिळवला आहे.

पाकिस्तान लष्कराने पाठवली मदत

अतिरेक्यांनी एका निवेदनात महिला, मुले आणि बलुच प्रवाशांना सोडल्याचा दावा केला आहे. परंतु, लष्करी जवानांना अजूनही ओलीस ठेवण्यात आले आहे. पाकिस्तानी लष्करानेही मदत पथकासह एक मदत ट्रेन रवाना केली आहे. दरम्यान, गृहमंत्री मोहसिन नक्वी म्हणाले की, “सरकार निरपराध प्रवाशांवर गोळीबार करणाऱ्यांना सोडणार नाही.” तर, “बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत आणि परिस्थितीचा सामना करण्यासाठी बचाव पथके पाठवली आहेत”, असे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी सांगितले.

सुरक्षा दलांनी सांगितले की, बोगद्याजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला होता आणि डोंगराळ भागात दहशतवाद्यांशी त्यांची चकमक सुरू होती. बीएलए हा अनेक वांशिक गटांपैकी सर्वात मोठा आहे जो सरकारविरुद्ध, विशेषतः बलुचिस्तानमध्ये दशकांपासून लढत आहे. ते या प्रदेशातील समृद्ध वायू आणि खनिज संसाधनांचे अन्याय्यपणे शोषण करत आहेत. बलुचिस्तानमध्ये या प्रदेशातील सरकार, सैन्य आणि चिनी हितसंबंधांवर वारंवार हल्ले झाले आहेत.

रेल्वे प्रवाशांशी अद्याप संपर्क नाही

रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रवासी ट्रेनच्या नऊ डब्यांमधील ४५० प्रवासी आणि कर्मचाऱ्यांशी कोणताही संपर्क झालेला नाही. पाकिस्तानपासून बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी वकिली करणाऱ्या विविध बलुच प्रतिरोधक गटांनी पाकिस्तान आणि चीनविरुद्ध नवीन तीव्र आक्रमणाची घोषणा केली. त्यानंतर बलुच नॅशनल आर्मी नावाच्या एका एकत्रित संघटनेची घोषणा करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच हा हल्ला झाला आहे.

Story img Loader