Pakistan Train Hijack : पाकिस्तानमधील पेशावरच्या दिशेने जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसला हायजॅक करून दहशतवाद्यांनी प्रवाशांना ओलीस ठेवल्याची घटना नुकतीच घडली. जवळपास ४४० प्रवासी दहशतवाद्यांच्या ताब्यात होते. यापैकी २१ प्रवाशांचा मृत्यू झाला असून उर्वरित प्रवाशांची सुटका करण्यात पाकिस्तान लष्कराला यश मिळालं. मात्र, या हल्ल्यावरून पाकिस्तानने भारतावर गंभीर आरोप केले होते. या एक्सप्रेस हायजॅक प्रकरणात भारताचा हात असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी केला होता. आता पाकिस्तानच्या या आरोपाला भारताने जोरदार प्रत्युत्तर देत भारताने पाकिस्तानची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, “पाकिस्तानने केलेले निराधार आरोप आम्ही फेटाळून लावतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे? हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने स्वतःच्या अंतर्गत समस्या आणि अपयशांचा दोष इतरांवर ढकलण्याऐवजी एकदा तरी स्वत:कडे पहावं”, असं म्हणत भारताने पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी गुरुवारी दावा केला होता की, “जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात सहभागी असलेले बंडखोर अफगाणिस्तानातील रिंग नेत्यांच्या संपर्कात होते. पाकिस्तानमधील दहशतवादात भारताचा सहभाग आहे. जाफर एक्सप्रेसवरील हल्ल्यात दहशतवादी अफगाणिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांच्या आणि टोळीच्या नेत्यांच्या संपर्कात होते”, असं शफकत अली खान यांनी पत्रकार परिषदेत बोलताना म्हटलं होतं.

नेमकं काय घडलं होतं?

क्वेट्टाकडून पेशावरकडे जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेसच्या ९ डब्यांमध्ये ४४० प्रवासी होते. क्वेट्टापासून १६० किमी अंतरावर डोंगराळ प्रदेशातून जात असताना गुदलार आणि पिरू कुनरी येथे बोगद्यात स्फोट घडवून ट्रेनचं अपहरण करण्यात आलं होतं. ‘बलोच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. सुरक्षा दलांनी १९० प्रवाशांची सुटका केली. कारवाईदरम्यान दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांशी सातत्याने संपर्क केला. त्यावरून यामागे परकीय हात होता हे स्पष्ट असल्याचे शरीफ यांनी नमूद केले.

तसेच मोहसीन नक्वी यांनी सुरक्षा दलांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. या हल्ल्यात सहभागी असलेल्या सर्व ३३ दहशतवाद्यांना ठार केल्याचे त्यांनी सांगितले. निरपराध मुले आणि महिलांचा मानवी ढाल म्हणून वापर करणे चुकीचे असल्याचे नक्वी यांनी स्पष्ट केले. या घटनेमागच्या सुत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं होतं.