Parliament Session Row Over Budget : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प मंगळवारी (२३ जुलै) लोकसभेत सादर करण्यात आला. त्यानंतर आता लोकसभा व राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे. सत्ताधारी व विरोधी पक्षांमधील खासदार अर्थसंकल्पावरील आपापली मतं मांडत आहेत. लोकसभेतील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसला लोकसभेच्या अध्यक्षांकडून (ओम बिर्ला) सभागृहात ४ तास बोलण्याची परवानगी मिळाली आहे. लोकसभेत काँग्रेस खासदार आक्रमक झालेले असताना राज्यसभेतही काँग्रेस, समाजवादी पार्टी, शिवसेनेचा ठाकरे गट, तृणूल काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटातील खासदार आक्रमक झाले आहेत. दरम्यान, विरोधी पक्षांमधील खासदारांनी सरकारवर भेदभावाचे आरोप केल्यानंतर सत्ताधारी खासदारांनी देखील प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ झाला. परिणामी विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहातून बाहेर पडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन्ही सभागृहातील खासदारांनी संसदेच्या बाहेर जाऊन सरकारविरोधात घोषणा दिल्या. विरोधी पक्षनेते राहुल गांधींसह काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. एका बाजूला विरोधक आक्रमक झालेले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनातील पंतप्रधान कार्यालयात मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकारच्या पुढील रणनीतीवर चर्चा होत असल्याचं सांगितलं जात आहे.

हे ही वाचा >> Nirmala Sitharaman : “प्रत्येक राज्याचं नाव घेणं शक्य नाही”, ‘भेदभावपूर्ण अर्थसंकल्पा’वर सीतारमण यांचं स्पष्टीकरण; महाराष्ट्राचा उल्लेख करत म्हणाल्या…

सरकारने इतर राज्यांच्या तोंडाना पानं पुसली : अखिलेश यादव

दरम्यान, समाजवादी पार्टीचे प्रमुख आणि खासदार अखिलेश यादव याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, शेतकऱ्यांच्या पिकांना चांगला हमीभाव मिळावा, अशी आमची अपेक्षा होती. सरकार यासाठी काहीतरी करेल असं वाटत होतं. मात्र सरकारने शेतकऱ्यांचा विचार न करता केवळ त्यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांचा विचार केला आहे. ज्यांच्या जीवावर मोदींचं सरकार टिकून आहे त्यांची काळजी घेतली गेली आहे. देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. मात्र, त्यावरही सरकारने कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. उत्तर प्रदेश राज्याला काहीच मिळालेलं नाही. डबल इंजिन सरकारचा आमच्या राज्याला काहीतरी फायदा होईल असं वाटत होतं. परंतु, सरकारने केवळ इतर राज्यांच्या (बिहार व आंध्र प्रदेश वगळता) तोंडाला पानं पुसली आहेत.

दरम्यान, दोन्ही सभागृहातील गोंधळानंतर काही वेळाने लोकसभा व राज्यसभेचं कामकाज सुरू झालं आहे. संसदेच्या आवारात घोषणाबाजी केल्यानंतर विरोधी पक्षांमधील खासदार सभागृहात परतले आहेत. मात्र त्यांनी सरकारवर भेदभावाचा आरोप केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament session opposition mps walkout of rajya sabha amid row over budget asc
Show comments