Pawan Kalyan : सनातन धर्माच्या रक्षणासाठी केंद्रीय कायदा हवा अशी मागणी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी केली आहे. तिरुपती या ठिकाणी पवन कल्याण ( Pawan Kalyan ) यांनी एका रॅलीला संबोधित करताना ही मागणी केली आहे. तसंच गुरुवारी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद लाडूंमध्ये भेसळ झाल्याचाही मुद्दा उपस्थित केला होता.

पवन कल्याण काय म्हणाले?

पवन कल्याण ( Pawan Kalyan ) यांनी लाडूंमध्ये झालेल्या भेसळीवरुन थेट YSRCP चे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांना लक्ष्य केलं नाही. पण मागील सरकारकडून जे मंडळ मागच्या सरकारच्या कार्यकाळात होतं त्यांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले. पवन कल्याण म्हणाले, “लाडूंमधल्या प्रसादातली भेसळ, जनावराची चरबी वापरली जाण्याचा प्रकार हे सगळं हिमनगाचं टोक आहे. आपल्याला हे नक्की ठाऊक नाही की मागच्या पाच वर्षांत नेमके किती कोट्यवधी रुपये गोळा करण्यात आले. त्यासंदर्भातली चौकशी झाली पाहिजे. तसंच लाडूंमध्ये भेसळ करण्याचा निर्णय का घेतला गेला? लोकांच्या भावनेशी का खेळण्यात आलं? याचीही चौकशी झाली पाहिजे. शिवाय या मंदिरात जे रोखीने दान येतं त्यात मागच्या पाच वर्षांत किती रुपये गोळा झाले त्याचा काही हिशेब आहे का? त्यासंदर्भातली चौकशी झाली पाहिजे.” अशी मागणी पवन कल्याण ( Pawan Kalyan ) यांनी केली.

चंद्राबाबू नायडू यांच्याबाबत काय म्हणाले पवन कल्याण?

पवन कल्याण ( Pawan Kalyan ) म्हणाले, मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी लाडूंमध्ये झालेल्या भेसळीचं प्रकरण बाहेर काढलं. ते सत्यच आहे. प्रयोगशाळेतही हे नमुने तपासण्यात आले आणि भेसळ झाल्याची बाब समोर आली. सनातन धर्माचं मागच्या पाच वर्षांत काय झालं असेल याचं हे प्रसाद लाडू प्रकरण हे एक उदाहरण आहे. सनातन धर्माचं रक्षण करायचं असेल तर कायदा आणण्याची गरज आहे. मी हिंदू आहे आणि मला त्याचं वाईट वाटत नाही. जे सुडो सेक्युलर आहेत त्यांनी माझी ही भूमिका लक्षात घ्यावी. एवढंच नाही तर आज या मंचावरुन तुम्हाला हे सांगू इच्छितो की सतातन धर्म आहे, होता आणि यापुढेही राहणार आहे. तुमच्यासारखे सुडो सेक्युलर लोक येतील आणि जातील. सनातन धर्म मात्र चिरंतन आहे. हा धर्म कुणीही संपवू शकत नाही, त्याचं अस्तित्व कुणी मिटवू शकत नाही. असंही पवन कल्याण ( Pawan Kalyan ) यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Tirupati Rule: पवन कल्याणांच्या मुलीने ‘अहिंदू दाखल्या’वर सही करत घेतले तिरुपतीचे दर्शन

पवन कल्याण यांनी लाडूंमधील भेसळ प्रकरण समोर आल्यानंतर प्रायश्चित म्हणून ११ दिवसांचा उपवास केला होता. त्यानंतर त्यांनी तीन दिवस तिरुमला तिरुपती मंदिराची यात्रा केली. तसंच विविध प्रकारच्या पूजा त्यांनी केल्या. आज तिरुपती मंदिर परिसरात त्यांनी एक भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी सनातन धर्माचं रक्षण करण्यासाठी केंद्रीय कायदा केला गेला पाहिजे असं म्हटलं आहे.