पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंत्रोच्चाराच्या गजरात भूमिपूजन सोहळा पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्याचा उल्लेख केला. अयोध्येमध्ये राम मंदिर बांधण्यासाठी भारतामधील सर्व सामान्यांनी सहकार्य केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी सर्वच देशवासियांचे कौतुक केलं. यावेळेस त्यांनी प्रभू रामचंद्रांना अगदी वानरांपासून खारीने मदत केली होती असा दाखलाही दिला. याचबरोबर मोदींनी काही ऐतिहासिक संदर्भ देत महान व्यक्तींना सामान्यांना केलेल्या सहकार्यमुळेच मोठे कार्य करता आले असं नमूद केलं. याचवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अयोध्येमधील राम मंदिराबरोबर नवीन इतिहास रचला जात आहे त्याचबरोबर इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. ज्याप्रमाणे खारीपासून वानरांपर्यंत आणि नावाड्यापासून ते वनामध्ये राहणाऱ्यांपर्यंत सर्वांना प्रभू रामचंद्राच्या विजयामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य मिळालं. लहान लहान मुलांनी भगवान श्री कृष्णाला गोवर्धन पर्वत उचलल्याच्या परक्रमामध्ये महत्वपूर्ण भूमिका पार पडली, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थपानेसाठी मावळ्यांनी सहकार्य केलं, महाराज सोहेलदेव यांना लढाईमध्ये गरिबांनी आणि मागासलेल्या लोकांनी मदत केली, दलित, मागास, आदिवासींबरोबरच सर्वच स्तरातील लोकांनी स्वातंत्र्याच्या लढ्यात गांधीजींनी सहकार्य केलं, त्याचप्रमाणे आज देशभरातील लोकांच्या सहकार्यामुळे राम मंदिराच्या उभारणीचे हे पवित्र काम सुरु झालं आहे,” असं मोदी आपल्या भाषणामध्ये म्हणाले.

आणखी वाचा- पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार – नरेंद्र मोदी

पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार

पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभारी मानले. राम मंदिराच्या टपाल तिकीटाचंही मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. आज प्रभू रामाचा जयघोष संपूर्ण जगभरात होत आहे असं सांगत मोदींनी सर्व देशवासी आणि जगभरात असलेल्या भारतभक्त आणि रामभक्तांना शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदींनी सियावर रामचंद्र की जय घोषणेने आपल्या भाषणाला सुरुवात केली.

आणखी वाचा- हा तर भारताच्या नवनिर्माणाचा शुभारंभ – मोहन भागवत

…म्हणून आमंत्रण स्वीकारलं

शरयू नदीच्या काठावर सुवर्ण इतिहास लिहिला गेला आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. मंदिराच्या भूमिपूजनाचा आमंत्रण का स्वीकारलं हे सांगताना पंतप्रधान मोदींकडून रामकार्य केल्याशिवाय मला आराम मिळत नाही अशी भावना व्यक्त केली. “आज संपूर्ण भारत राममय झाला आहे. संपूर्ण देश रोमांचित आहे, प्रत्येकजण भावूक आहे. कित्येक दशकांची प्रतिक्षा आज संपत आहे. करोडो लोकांना आज आपण हा क्षण जिवंतपणी पाहू शकत आहोत यावर विश्वासच बसत नसेल,” असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं. संकटाच्या चक्रव्युहातून रामजन्मभूमी मुक्त झाली असंही ते भाषणामध्ये म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm modi remembers chatrapati shivaji maharaj and his mavle in ram mandir bhoomi pujan ceremony speech scsg