पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिरंग्यावर केलेल्या स्वाक्षरीमुळे तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून मोदी यांनी तिरंग्याच्या नियमावलीचा भंग केला असल्याची टीका करण्यात आली. शेफ विकास खन्ना यांच्यामार्फत भारताचा राष्ट्रध्वज अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना देण्यात येणार आहे. मोदी यांनी राष्ट्रध्वजावर केलेल्या स्वाक्षरीचा मुद्दा समाज माध्यमांनीही उचलून धरला होता.
पंतप्रधान मोदी यांची गुरुवारी रात्री ‘फॉच्र्युन’च्या ५०० मुख्याधिकाऱ्यांसमवेत रात्री बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत खन्ना यांनी मोदी यांच्या जेवणाचे खाद्यपदार्थ ठरविले होते. त्याच कार्यक्रमात मोदी यांच्या स्वाक्षरीचा तिरंगाही खन्ना यांनी ठेवला होता. मात्र, त्यामुळे ध्वजाच्या संहितेचा भंग झाला आहे किंवा नाही, यासंबंधी वादंग निर्माण झाल्यामुळे हा तिरंगा तेथून अन्यत्र नेण्यात आला. भारतीय ध्वजसंहिता २००२ नुसार, भारताच्या राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारचा मजकूर लिहिण्यात आल्यास त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अनादर होतो.
दरम्यान, पंतप्रधानांनी राष्ट्रध्वजावर स्वाक्षरी केल्यामुळे भारतीय दंडविधानानुसार गुन्हा ठरतो काय, असा प्रश्न विचारला असता, आम्ही भाजपसारखे नाही. आम्ही पंतप्रधानांच्या कार्यालयाचा आदर राखतो, असे उत्तर काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिले. त्याच वेळी पंतप्रधानांनीही यात लक्ष घालून राष्ट्रध्वजाचा आदर राखण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशीही सूचना त्यांनी केली. तुम्ही कितीही उच्चपदी असलात तरीही राष्ट्रध्वज तुमच्याही पेक्षा उच्च आहे आणि हे तुम्हाला समजले पाहिजे, असे सुरजेवाला यांनी स्पष्ट केले.
ध्वजसंहिता २००२ मधील परिच्छेद २.१ व उप परिच्छेद ६ आणि परिच्छेद ३.२८ पंतप्रधानांनी वाचले आहेत काय, अशी विचारणा करून त्या परिच्छेदांमध्ये राष्ट्रध्वजावर काही लिहिणे म्हणजे राष्ट्रध्वजाचा अवमान करण्यासारखे असून यासंबंधी २००३ मध्ये मंजूर केलेल्या कायद्यातील तरतुदीनुसार, तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो, याकडे काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी लक्ष वेधले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा