पंतप्रधान नरेंद्र मोदी

भारताचे माजी उपराष्ट्रपती आणि आदरणीय राजकीय नेते एम. व्यंकय्या नायडू गारू आज ७५ वर्षांचे होत आहेत. मी त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. ज्या नेत्याचा जीवन प्रवास समर्पण, अनुकूलता आणि जनतेच्या सेवेप्रति अविचल बांधिलकीचे दर्शन घडवतो, अशा नेत्याचा सन्मान करण्याचा हा एक प्रसंग आहे. राजकीय क्षेत्रातील त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून ते उपराष्ट्रपती म्हणून त्यांच्या कार्यकाळापर्यंत व्यंकय्या गारू यांची कारकीर्द भारतीय राजकारणातील गुंतागुंतींना सहजतेने आणि विनम्रतेने हाताळण्याच्या त्यांच्या असामान्य क्षमतेचा दाखला देते. त्यांचे वक्तृत्व, विद्वत्ता आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने असलेला भर यांमुळे त्यांना सर्वच पक्षांकडून आदर प्राप्त झाला आहे.

व्यंकय्या गारू आणि माझा अनेक दशकांपासूनचा परिचय आहे. आम्ही एकत्र काम केले आहे आणि मी त्यांच्याकडून बरेच काही शिकलो आहे. त्यांच्या आयुष्यात जर एखादी गोष्ट नेहमीच कायम राहिली असेल तर ती म्हणजे लोकांविषयीचे प्रेम.

आंध्र प्रदेशातील विद्यार्थी राजकारणातील एक विद्यार्थी नेते म्हणून सक्रिय झाल्यावर विविध प्रश्नांवर सक्रिय राहण्याची त्यांची वाटचाल सुरू झाली आणि राजकीय जीवनाला प्रारंभ झाला. त्यांची प्रतिभा, वक्तृत्व आणि संघटनात्मक कौशल्ये लक्षात घेता, कोणत्याही राजकीय पक्षात त्यांचे स्वागतच झाले असते. परंतु ते ‘राष्ट्र प्रथम’ या दृष्टिकोनातून प्रेरित असल्यामुळे त्यांनी संघ परिवारासोबत काम करण्यास प्राधान्य दिले. त्यांनी रा. स्व. संघ, अभाविप या संघटनांबरोबर काम केले आणि त्यानंतर त्यांनी जनसंघ आणि भाजपला बळकट केले.

हेही वाचा >>> विमानतळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह! छत कोसळण्याच्या तीन दिवसांत तीन दुर्घटना

सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा आणीबाणी लागू करण्यात आली, तेव्हा युवा व्यंकय्या गारू यांनी आणीबाणीविरोधी चळवळीत स्वत:ला झोकून दिले. त्यांना तुरुंगवास झाला होता आणि तेदेखील का तर त्यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना आंध्र प्रदेशात आमंत्रित केले म्हणून. लोकशाहीप्रति असलेली ही बांधिलकी त्यांच्या राजकीय कारकीर्दीत वारंवार दिसून येईल. १९८०च्या दशकाच्या मध्यावर, जेव्हा एनटीआर यांचे सरकार काँग्रेसने कोणताही विधिनिषेध न बाळगता बरखास्त केले, तेव्हा लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्याच्या चळवळीत ते अग्रस्थानी होते.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीच्या महाकाय लाटांमध्येही अगदी सहजतेने तरून जाण्यात व्यंकय्या गारू नेहमीच यशस्वी ठरले. १९७८ मध्ये आंध्र प्रदेशने काँग्रेसला मतदान केले, परंतु त्यांनी हा कल बदलून टाकला आणि ते तरुण आमदार म्हणून निवडून आले. पाच वर्षांनंतर जेव्हा आंध्रात एनटीआर यांची त्सुनामी आली, तेव्हाही ते भाजपचे आमदार म्हणून निवडून आले, ज्यामुळे राज्यभर भाजपच्या वाढीचा मार्ग मोकळा झाला.

ज्यांनी व्यंकय्या गारू यांना बोलताना ऐकले असेल त्यांना त्यांच्या वक्तृत्वकौशल्याचा प्रभाव जाणवला असेल. ते नक्कीच एक शब्दप्रभू आहेत पण तितकेच ते कार्यप्रभूदेखील आहेत. एक युवा आमदार असण्याच्या दिवसांपासून त्यांनी विधानमंडळातील कामकाजात जे परिश्रम घेतले आणि आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्यांना आवाज दिला त्याबद्दल ते आदराला पात्र ठरले. एनटीआर यांच्यासारख्या दिग्गजानेही त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि अगदी त्यांनाही व्यंकय्या त्यांच्या पक्षात यावेत असे वाटत होते, मात्र व्यंकय्या गारू यांनी त्यांच्या मूळ विचारधारेपासून विचलित होण्यास नकार दिला. आंध्र प्रदेशात भाजपला बळकट करण्यात आणि या पक्षाला गावोगावी पोहोचवण्यात आणि सर्व स्तरातील लोकांना यामध्ये सामावून घेण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांनी विधानसभेच्या सदनात पक्षाचे नेतृत्व केले आणि आंध्र प्रदेश भाजपचे ते अध्यक्षदेखील बनले.

१९९० मध्ये भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने व्यंकय्या गारूंच्या प्रयत्नांची दखल घेतली आणि १९९३ मध्ये पक्षाच्या अखिल भारतीय सरचिटणीसपदावर त्यांची नेमणूक केली त्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील त्यांच्या वाटचालीचा प्रारंभ झाला. दिल्लीमध्ये प्रवेश झाल्यावर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही आणि त्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनण्यापर्यंत त्यांनी आगेकूच केली.

२००० मध्ये जेव्हा अटलजी व्यंकय्या नायडू यांना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री बनवण्यासाठी आग्रही होते, त्यावेळी व्यंकय्या गारू यांनी तातडीने ग्रामीण विकास मंत्रालयाला त्यांची पसंती असल्याचे त्यांना कळवले. यामुळे अटलजींसह सगळेच संभ्रमात पडले. पण व्यंकय्या गारू यांचे विचार स्पष्ट होते, ते किसानपुत्र होते आणि त्यांनी आपले सुरुवातीचे दिवस खेड्यात व्यतीत केले होते. त्यामुळे त्यांची ग्रामीण विकास क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती. मंत्री या नात्याने ‘प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना’ ही संकल्पना आणि त्याच्या कार्यान्वयनाशी ते जवळून जोडले गेले होते. अनेक वर्षांनंतर २०१४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकार सत्तेवर आले, त्यावेळी त्यांनी नगरविकास, गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या कार्यकाळातच आम्ही स्वच्छ भारत मोहीम आणि शहरी विकासाशी संबंधित महत्त्वाच्या योजना सुरू केल्या. बहुतेक, ग्रामीण आणि शहरी विकासासाठी एवढ्या मोठ्या कालावधीत काम करणारे ते एकमेव नेते असावेत.

आमच्या आघाडीने २०१७ मध्ये त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले. व्यंकय्या गारू यांचे सरकारमधील महत्त्वाचे स्थान भरून काढणे कसे अशक्य आहे याचा विचार करताना आम्हाला पेचप्रसंगाचा सामना करावा लागला, मात्र त्याच वेळी, उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्यापेक्षा चांगला उमेदवार कोणी नाही हेदेखील आम्हाला ज्ञात होते. मंत्रीपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा देताना त्यांनी केलेले भाषण आपण कधीच विसरू शकत नाही. पक्षाशी असलेला त्यांचा संबंध आणि पक्षाची बांधणी करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण सांगताना त्यांना आपले अश्रू अनावर झाले. यातून त्यांची खोलवर रुजलेली वचनबद्धता आणि उत्कटता याचे ओझरते दर्शन घडले. उपराष्ट्रपतीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध पावले उचलली, ज्यामुळे कार्यालयाची प्रतिष्ठाही वृद्धिंगत झाली. युवा खासदार, महिला खासदार आणि पहिल्यांदाच खासदार झालेल्यांना बोलण्याची संधी मिळावी याची दक्षता घेणारे असे ते राज्यसभेचे उत्कृष्ट सभापती होते. त्यांनी उपस्थितीवर अधिक भर देत समित्यांचे कामकाज अधिक प्रभावी केले आणि सभागृहात चर्चेचा स्तरही उंचावला. अनुच्छेद ३७० आणि ३५ (ए) रद्दबातल करण्याचा निर्णय राज्यसभेच्या पटलावर ठेवण्यात आला तेव्हा व्यंकय्या गारू अध्यक्षस्थानी होते. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अखंड भारताच्या स्वप्नाकडे आकर्षित झालेला हा युवक हे स्वप्न जेव्हा प्रत्यक्षात उतरले तेव्हा अध्यक्षस्थानी असल्याने हा त्यांच्यासाठी खूप भावनिक क्षण ठरला असेल याची आपल्याला खात्री आहे. उपराष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यानंतरही व्यंकय्या गारू हे सार्वजनिक जीवनात सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांचे जिव्हाळ्याचे विषय तसेच देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडींबाबत ते मला फोन करतात आणि आपल्याकडून त्याविषयी जाणून घेतात. अगदी अलीकडे आमचे सरकार तिसऱ्यांदा पदावर आल्यावर मी त्यांना भेटलो. ते आनंदित झाले होते आणि त्यांनी मला आणि आपल्या सहकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या त्यांच्या एकूणच मैलाचा दगड ठरलेल्या कारकीर्दीसाठी मी त्यांना पुनश्च एकवार शुभेच्छा देतो. मला आशा आहे की युवा कार्यकर्ते, निवडून आलेले प्रतिनिधी आणि सेवा करण्याची आवड असलेले सर्व जण त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन ती मूल्ये आत्मसात करतील. त्यांच्यासारखे लोकच आपल्या देशाला अधिक चांगले आणि चैतन्यशील बनवतात.