PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी दिल्लीच्या आरके पुरम या ठिकाणी सभा घेतली. यावेळी त्यांनी पंडीत नेहरू, इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसच्या आत्तापर्यंतच्या सरकारच्या कर धोरणावर टीका केली. सामान्य माणसांना केंद्र सरकारने १२ लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त केलं. जर तुम्ही आज नेहरुंच्या काळात असतात तर १२ लाख रुपयांच्या एक चतुर्थांश भाग तुम्हाला कर म्हणून द्यावा लागला असता. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी?
“दिल्लीत यावेळी भाजपाचं सरकार येणार आहे. दिल्लीची ‘आपदा’ म्हणजेच आप सरकारने दिल्लीच्या नागरिकांची ११ वर्षे वाया घालवली. दिल्लीकरांना माझं आवाहन आहे की दिल्लीकरांना यावेळी भाजपाला त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी. मी तुम्हाला गॅरंटी देतो की प्रत्येक नागरिकाची अडचण दूर करण्यासाठी मी मेहनत घेईन. आपल्याला असं सरकार आणायचं आहे जे सरकार दिल्लीची सेवा करेल. आपल्याला आता आपदा सरकार नको” असं म्हणत त्यांनी आप सरकारवर जोरदार टीका केली आहे.
मतदानाच्या आधीच आपच्या झाडूच्या काड्या विखुरल्या आहेत-मोदी
“मतदानाच्या आधीच झाडूच्या काड्या काड्या विखरुन गेल्या आहेत, असं म्हणत त्यांनी आपवर टीका केली आहे. तसंच आपदाचे नेतेही त्यांची साथ सोडत आहेत. कारण आता दिल्लीकरांनाच नाही तर आपमधल्या लोकांनाही समजलं आहे की आपवर दिल्ली नाराज आहे. दिल्लीकरांच्या मनात जो राग आहे त्यामुळे आपदा पक्षाचे लोक घाबरले गेले आहेत. ते रोज काहीतरी खोट्या घोषणा करत आहेत. पण आता आपचा मुखवटा उतरला आहे. १० वर्षांपासून खोटं बोलून ते मतं मागत आहेत” अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली.
नेहरु, इंदिरा गांधी किंवा काँग्रेसचं सरकार असतं तर १२ लाखांवर ३ लाखांचा कर लागला असता-मोदी
यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजेटचं उदाहरणही दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, “एकीकडे आप पक्षाच्या खोट्या घोषणा आहेत, दुसरीकडे तुमचा सेवक. मोदीची गॅरंटी म्हणजे आश्वासन पूर्ण होण्याची गॅरंटी हे विसरु नका. आम्ही जो अर्थसंकल्प आणला तो सामान्य जनतेचा अर्थसंकल्प आहे. १० वर्षांत आपण भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरुन आपण पाचव्या क्रमांकावर आणली आहे. १२ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना सरकारने दिलासा दिला आहे. नेहरु, इंदिरा गांधी किंवा काँग्रेसचं सरकार असतं तर त्यांनी १२ लाखांच्या उत्पन्नावर एक चतुर्थांश कर म्हणजेच जवळपास ३ लाख रुपये कर घेतला असता.” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.