Narendra Modi Targets Congress: देशभरात आज ७८व्या स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित जनसमुदायाला व देशभरातील नागरिकांना उद्देशून सविस्तर भाषण केलं. या भाषणात मोदींनी त्यांच्य कार्यकाळात कोणकोणती कामं करण्यात आली, यासंदर्भात माहिती दिली. तसेच, वन नेशन, वन इलेक्शन, समान नागरी कायदा असे अनेक मुद्दे मांडले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे टीकास्र सोडलं. यावेळी समोरच्या मान्यवरांमध्ये लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधीही उपस्थित होते.

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणातून काँग्रेसचा उल्लेख न करता अप्रत्यक्षपणे पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला लक्ष्य केलं. “सुधारणांच्या प्रयत्नांना शक्ती दिली गेली आहे. जेव्हा राजकीय नेतृत्वाचा संकल्प असेल, जेव्हा सरकारी यंत्रणा सुधारणा लागू करण्यासाठी समर्पण भावाने कामाला लागते, देशाचे नागरिक ते जनआंदोलन म्हणून स्वीकारतात तेव्हा निश्चित परिणाम दिसतोच”, असं मोदी म्हणाले.

PM Narendra Modi Independence Day Speech (1)
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावण्यात आला.

“या देशानं असाही काळ पाहिलाय जेव्हा ‘होईल, केलं जाईल, हे तर चालेलच, आपण कशाला कष्ट करायचे? पुढची पिढी पाहून घेईल, आपल्याला संधी मिळाली आहे मजा करून घ्या, पुढचा येईल तो बघून घेईल’ असे विचार होते. कुणास ठाऊक का पण देशात जैसे थे परिस्थितीचं वातावरण बनलं होतं. लोक म्हणायचे ‘सोडा, आता काही होणार नाहीये. असंच चालणार’. आम्हाला या मानसिकतेला छेद द्यायचा होता. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले”, अशा शब्दांत मोदींनी अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीका केली.

“आमच्या सुधारणा वर्तमानपत्राच्या संपादकीयासाठी नाहीत”

“देशातला सामान्य नागरिक बदलाच्या प्रतीक्षेत होता. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. त्यामुळे तो संकटांचा सामना करून गुजराण करत राहिला. आम्हाला जबाबदारी दिली गेली आणि आम्ही मोठ्या सुधारणा घडवून आणल्या. गरीब, मध्यम वर्ग, वंचित वर्ग, शहरी नागरीक, तरुणांच्या आकांक्षा यामध्ये बदल आणण्याचा मार्ग आम्ही निवडला. सुधारणेसाठीची आमची बांधिलकी पिंक पेपरच्या संपादकीयापर्यंत मर्यादित नाही. ती ४ दिवसांच्या कौतुकासाठी नाही. कुठल्या नाईलाजामुळे नाहीये. देशाला मजबुती देण्याच्या निश्चयाने आहे. आम्ही राजकीय नाईलाजाने सुधारणा केलेल्या नाहीत. आम्ही राजकीय गुणाकार-भागाकाराचा विचार करत नाही”, असा टोलाही मोदींनी लगावला.

“मायबाप संस्कृती…”

“दुर्दैवानं आपल्या देशात स्वातंत्र्य तर मिळालं, पण लोकांना एक प्रकारे ‘मायबाप संस्कृती’तून जावं लागलं. सरकारकडे हात पसरत राहा, मागत राहा, कुणाच्यातरी ओळखीसाठी मार्ग शोधत राहा हीच पद्धत होती. आम्ही ही पद्धत बदलली आहे. आज सरकार स्वत: लाभार्थ्यांकडे जाते, त्याच्या घरात पाणी-वीज पोहोचवते, त्याच्या घरी गॅस पोहोचवते, सरकार स्वत: त्याला आर्थिक मदत देऊन विकास करण्यासाठी प्रोत्साहन देते, त्यांच्या कौशल्याचा विकास करण्यासाठी पाऊलं उचलते. मोठ्या सुधारणांसाठी आमचं सरकार बांधील आहे”, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले.

PM Narendra Modi Full Speech: पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून केला समान नागरी कायद्याचा उल्लेख; वन नेशन, वन इलेक्शनसाठीही केलं आवाहन, म्हणाले…

“आपल्या देशात सवय झाली होती की देशाला कमी लेखणं, गौरवाची भावना नसणं हे दिसत होतं. देशाला या गोष्टींमधून बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आहे”, असंही त्यांनी नमूद केलं.

पंतप्रधानांनी भाषणात विकृत लोकांचा केला उल्लेख, पण रोख कुणाकडे?

“आपण संकल्प करून पुढे वाटचाल करतोही आहोत. पण हेही खरं आहे की काही लोक प्रगती पाहू शकत नाहीत. भारताचं चांगलं चिंतू शकत नाहीत. जोपर्यंत स्वत:चं भलं होत नाही, तोपर्यंत इतरांचं भलं त्यांना बघवत नाही. देशाला अशा लोकांपासून वाचावं लागेल. हे निराशेच्या गर्तेत गेलेले लोक आहेत. असे मूठभर लोक, जेव्हा त्यांच्या हातात विकृती वाढत असते, तेव्हा ती सर्वनाशासाठी कारणीभूत ठरते. तेव्हा देशाचं एवढं नुकसान होतं की त्याची भरपाई करण्यासाठी आपल्याला नव्याने सुरुवात करावी लागते. त्यामुळे असे निराशावादी लोक फक्त निराशच नाही, त्यांच्या मनात विकृती तयार होत आहे. ती विकृती सर्वनाशाची स्वप्नं पाहात आहे”, अशी टीका पंतप्रधानांनी यावेळी केली. मात्र, त्यांचा रोख नेमका कुणाकडे होता, यावर त्यांनी स्पष्ट भाष्य केलेलं नाही.