देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. निवडणूक आयोगाकडून लवकरच या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. दरम्यान, भारतीय जनता पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांसह देशभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अशातच निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस १०० जागादेखील जिंकू शकणार नाही. मला काँग्रेसच्या जागांमध्ये फारसा बदल होईल दिसत नाहीये (२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या होत्या). दरम्यान, प्रशांत किशोर यांनी भाजपाच्या ‘अब की बार ४०० पार’ या घोषणेलाही फारसा अर्थ नसल्याचं वक्तव्य केलं आहे. प्रशांत किशोर म्हणाले, भाजपा ३७० जागादेखील जिंकू शकणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका वृत्तवाहिनीने प्रशांत किशोर यांना मुलाखतीवेळी विचारलं की, आगामी लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना कोणी आव्हान देऊ शकतं का? यावर प्रशांत किशोर म्हणाले, जी व्यक्ती पाच वर्षे जमिनीवर राहून (ग्राऊंड लेव्हलवर) काम करणार असेल, मेहनत करणार असेल ती व्यक्त मोदींसमोर मोठं आव्हान निर्माण करू शकते. मोदींना कोणीच पराभूत करू शकत नाही, असल्या भ्रमात कोणीही राहू नका. त्याचबरोबर वृत्तवाहिन्यांनीदेखील असल्या अफवा पसरवू नये.

प्रशांत किशोर म्हणाले, “मोदींना पराभूत करणं शक्य आहे. गेल्या १० वर्षांमध्ये मोदींनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी गेल्या १० वर्षांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये लहान-मोठे पराभव पाहिले आहेत.” प्रशांत किशोर यांनी बिहारमध्ये ‘जनसुराज यात्रा’ काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते बिहारमधील जनतेचं निवडणूक आणि मतदानाबाबत प्रबोधन करत आहेत. प्रशांत किशोर लवकरच अधिकृतपणे बिहारच्या राजकारणात उतरतील असं बोललं जात आहे.

प्रशांत किशोर यांनी दिलं १९७७ च्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण

प्रशांत किशोर म्हणाले, इंदिरा गांधी सत्तेत होत्या तेव्हा आणि राजीव गांधी यांनी प्रचंड बहुमताच सरकार बनवलं होतं तेव्हादेखील काही लोकांना असं वाटत होतं की यांना आता कोणीच पराभूत करू शकत नाही. परंतु, या देशातल्या जनतेने इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनादेखील पराभवाची चव चाखायला लावली होती. १९७७ मध्ये जनता पार्टीने इंदिरा गांधींसमोर मोठं आव्हान निर्माण केलं होतं. तसेच त्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधींनी सत्ता गमावली होती.

काँग्रेस किती जागा जिंकेल?

काँग्रेस पक्षाच्या वाटचालीबाबत प्रशांत किशोर म्हणाले, ५०-५५ जागा जिंकून तुम्ही या देशाचं राजकारण आणि सत्ताकारण बदलू शकत नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेससाठी काही सकारात्मक गोष्टी घडतील असं मला वाटत नाही. काँग्रेसमध्ये काही सकारात्मक बदल होताना मला दिसत नाहीत. मोठा बदल घडवून आणण्यासाठी काँग्रेसला किमान १०० जागा तरी जिंकाव्या लागतील. काँग्रेस १०० च्या आसपास पोहोचण्याची शक्यतादेखील कमीच आहे. सध्याच्या घडीला तरी ते शक्य नाही.

हे ही वाचा >> सुप्रिया सुळे की सुनेत्रा पवार? बारामती लोकसभा निवडणूक कोण जिंकणार? संजय काकडेंनी मांडलं संपूर्ण मतदारसंघाचं गणित

भाजपा ३७० जागा जिंकेल?

भाजपाने यंदाच्या निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. याबाबत प्रश्न विचारल्यावर प्रशांत किशोर म्हणाले, भाजपाने हे लक्ष्य केवळ त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी ठेवलं आहे. त्यांना सक्रीय ठेवण्यासाठी, त्यांच्याकडून अधिकाधिक मेहनत करून घेण्यासाठी, त्यांच्यातलं चैतन्य कायम राखण्यासाठी भाजपाने हे लक्ष्य ठेवलं आहे. परंतु, लोकांनी यावर विश्वास ठेवू नये. प्रत्येक नेत्याला आणि पक्षाला डोळ्यांसमोर एक मोठं आव्हान ठेवण्याचा अधिकार आहे. त्याने ते आव्हान पूर्ण केलं तर ती त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. परंतु, ते लक्ष्य पूर्ण करता आलं नाही तर त्या पक्षाने इतकं नम्र असावं की, त्यांनी त्यांच्या चुका स्वीकारायला हव्यात.

हे ही वाचा >> मोठी बातमी! तीन नवे फौजदारी कायदे १ जुलैपासून लागू होणार, IPC, CrPC लवकरच कालबाह्य

बंगालमध्ये काय स्थिती असेल?

प्रशांत किशोर यांनी अंदाज व्यक्त केला आहे की, भारतीय जनता पार्टी यावेळी पश्चिम बंगालमध्ये उत्तम कामगिरी करेल. पीके म्हणाले, पश्चिम बंगालमध्ये गाजत असलेल्या संदेशखाली प्रकरणाचा सत्ताधारी पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prashant kishor on lok sabha election 2024 results bjp cant win 370 seats congress wont get even 100 seats asc
Show comments