पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात जेडीयूच्या मंत्र्यांना महत्त्वाची खाती मिळाली नसल्याने बिहारमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून विरोधकांकडून नितीश कुमार यांना लक्ष्य केलं जात आहे. नितीश कुमार यांच्या पाठिंब्यामुळे एनडीए सरकार स्थापन झालं आहे, अशावेळी नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची खाती का मागितली नाही? अशी चर्चा सध्या बिहारच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा – “यादव आणि मुसलमानांचं एकही काम करणार नाही, त्यांनी मला…”, नितीश कुमारांच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

दरम्यान, याबाबत जनसुराज पक्षाचे प्रमुख तथा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाष्य केलं आहे. प्रशांत किशोर यांनी नुकताच एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलखात दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांना नितीश कुमारांनी महत्त्वाची खाती काम मागितली नाही, या चर्चेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, नितीश कुमारांनी जाणीवपूर्वक जिथे ते वाद किंवा अंतर्गत विरोधाचा सामना न करता काम करता येईल, अशा मंत्रालयाची निवड केली, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

नेमकं काय म्हणाले प्रशांत किशोर?

नितीश कुमार यांना मी इतरांपेक्षा जास्त ओळखतो. त्यांच्याबरोबर मी काम केलं आहे. नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे महत्त्वाची खाती मागितली नाही, कारण त्यांना भीती वाटते की, जर त्यांनी महत्त्वाची खाती पक्षांतल्या दुसऱ्या नेत्याला दिली, ते त्यांच्या नेतृत्वाला आव्हान देऊ शकतात. त्यामुळे नितीश कुमार यांनी कमी महत्त्वाच्या मंत्रालयाची निवड केली आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – विश्लेषण: नितीश कुमार यांच्या मनात काय? ‘इंडिया’ आघाडीत सक्रिय होण्यासाठीच पुन्हा पक्षाध्यक्ष?

पुढे बोलताना, जे लोक सक्रियपणे जनतेसाठी काम करतात त्यांना पदावर रहावं. कारण, अकार्यक्षम नेत्यांना घटनात्मक मार्गानं हटवण्याचा अधिकार नागरिकांना आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. तसेच मतदारांनी विकासाशी संबंधित मुद्द्यांना प्राधान्य द्यावं, असं आवाहनही त्यांनी केलं.