नवी दिल्ली : जागतिक पटलावर भारताला महत्त्वाचे स्थान मिळविण्यासाठी आपल्या राज्यघटनेतील संकल्पांवर विश्वास ठेवून ठाम राहणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेतला.

नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे चांगले परिणाम दिसायला सुरुवात झाल्याचे त्या म्हणाल्या. देशात मोठ्या आर्थिक प्रगतीचे युग सुरू होण्याचा पाया तयार झाला असून देशाला विकसित देशांच्या यादीत नेण्याच्या दिशेने काम सुरू झाल्याचेही त्यांनी जाहीर केले. सामाजिक न्यायाला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अनुसूचित जाती, जमाती व इतर वंचित घटकांच्या हितासाठी अनेक कल्याणकारी योजना हाती घेतल्या आहेत.

हेही वाचा >>>Punjab Govt vs Central Govt: “मला गडकरींना हे सांगायचंय की तुम्ही…”, ‘आप’ची ‘त्या’ पत्रावरून आगपाखड; पक्षप्रवक्ते म्हणाले…

आपल्या २० मिनिटांच्या भाषणात त्यांनी सरकारच्या विविध योजनांचा उल्लेख केला. अनेक अडथळ्यांमधून देशाने वाटचाल केली आहे. आपल्या घटनात्मक मूल्यांवर आपण ठाम राहिलो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रपतींनी उल्लेख केला. जवळपास ९७ कोटी मतदार होते, हा ऐतिहासिक विक्रम आहे. इतक्या मोठ्या संख्येने नागरिक मतदानाचा हक्क बजावतात, लोकशाहीच्या संकल्पनेला यातून बळकटी मिळते. आपल्या देशात शांततेत होणारी निवडणूक पाहता, जगभरातील लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या शक्तींना बळकटी मिळते असे राष्ट्रपतींनी नमूद केले.

दारिद्र्यरेषेखालील नागरिकांचे जीवनमान उंचावावे यासाठी प्रयत्न सुरू असून, ८० कोटी नागरिकांना मोफत देण्यात येत असलेल्या पीएम गरीब कल्याण अन्न योजनेचा उल्लेख केला. तसेच २०२१ ते २४ या कालावधीत देशाची अर्थव्यवस्था गतीने वाढली असे राष्ट्रपतींनी नमूद केले.