Lok Sabha Session Updates: गेल्या काही दिवसांपासून ५० वर्षांपूर्वी जाहीर झालेल्या आणीबाणीवर पुन्हा एकदा जोरदार चर्चा होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सर्वात आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला माध्यमांशी साधलेल्या संवादामध्ये आणीबाणीचा ‘काळा दिवस’ म्हणून उल्लेख केला. त्यानंतर सत्ताधारी गटाकडून सातत्याने आणीबाणीवर आक्रमक भूमिका मांडली जात असताना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर झालेल्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणातही आणीबाणीचा उल्लेख करण्यात आला. त्यावेळी विरोधी बाकांवरच्या सदस्यांनी गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणात राष्ट्रपतींनीही आणीबाणीला देशाच्या इतिहासातील काळा अध्याय असल्याचा उल्लेख केला.

नेमकं काय म्हणाल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू?

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण झालं. या भाषणात राष्ट्रपतींनी मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला. सरकारी उपक्रमांचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी २५ जून २०२४ रोजी आणीबाणीला झालेल्या ५० वर्षांच्या निमित्ताने त्यावर अभिभाषणात भाष्य केलं. “जेव्हा संविधान तयार होत होतं, तेव्हाही जगात असे गट होते जे भारताच्या अपयशी होण्याची इच्छा व्यक्त करत होते. देशात संविधान लागू झाल्यानंतरही संविधानावर अनेकदा हल्ले झाले आहेत. २५ जून १९७५ ला लागू झालेली आणीबाणी ही संविधानावरील थेट हल्ल्याचा सर्वात मोठा आणि काळा अध्याय होता”, असं राष्ट्रपती यावेळी म्हणाल्या.

पाहा संसदीय अधिवेशनाचं लाईव्ह कामकाज!

“आणीबाणी लागू झाली तेव्हा संपूर्ण देशात हाहा:कार माजला होता. पण अशा असंवैधानिक ताकदींवर देशानं विजय मिळवून दाखवला. कारण भारताचा पाया लोकशाही परंपरेचा आहे”, असंही द्रौपदी मुर्मू यांनी अभिभाषणात नमूद केलं.

कलम ३७०चाही केला उल्लेख

दरम्यान, देशाच्या राज्यघटनेवर बोलताना राष्ट्रपतींनी जम्मू-काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम ३७० चाही उल्लेख केला. “माझं सरकारही भारताच्या संविधानाला फक्त राज्यकारभाराचं माध्यम मानत नाही. आपली राज्यघटना नियमित जीवनाचा भाग व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच माझ्या सरकारनं २६नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा करायला सुरुवात केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्येही राज्यघटना पूर्णपणे लागू झाली आहे. तिथे कलम ३७० मुळे परिस्थिती वेगळी होती”, असं राष्ट्रपती म्हणाल्या.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात निवडणूक निकालांचा उल्लेख; विरोधकांचा गदारोळ; म्हणाल्या, “या निवडणुकांची चर्चा…”…

लोकसभा निवडणूक निकालांवरही राष्ट्रपतींचं भाष्य

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. मात्र, भारतीय जनता पक्षाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. त्यामुळे मित्रपक्षांच्या पाठिंब्यावर केंद्रात सरकार स्थापन झालं. या निवडणुकांसंदर्भात राष्ट्रपतींनी अभिभाषणात भाष्य केलं. “ही जगातली सर्वात मोठी निवडणूक होती. ६४ कोटी लोकांनी आपलं कर्तव्य बजावलं. महिलांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला. या निवडणुकीचं सुखद चित्र जम्मू-काश्मीरमध्ये समोर आलं. तिथे मतदानाचे अनेक दशकांचे विक्रम तुटले आहेत. गेल्या ४ दशकांमध्ये काश्मीरमध्ये आपण बंद आणि संपामध्येच मतदानाचं चित्र पाहिलं होतं. भारताचे शत्रू या गोष्टीला जागतिक मंचावर जम्मू-काश्मीरचं मत म्हणून प्रचार करत राहिले. पण यावेळी काश्मीरमध्ये देश आणि जगात या दुष्प्रचाराला कडवं उत्तर दिलं आहे. या निवडणुकीत पहिल्यांदाच घरी जाऊन मतदान करून घेतलं गेलं. मी लोकसभा निवडणुकीशी संबधित सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करते”, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यावेळी म्हणाल्या.